Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिक्षण विभागाने गेल्या वर्षी सर्वप्रथम शाळा पूर्व तयारी अभियान राबविले होते. यंदाही २०२३-२४ वर्षात पहिला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेत नव्याने प्रवेश घेणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मेळावा भरविला जाणार आहे.
अंगणवाड्यांमधून पहिलीत प्रवेश घेणारी मुले, त्याचबरोबर पहिल्यांदाच शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या मुलांची या अभियानाच्या माध्यमातून कौशल्ये तपासली जाणार आहेत. ज्या बालकांमध्ये पहिलीच्या वर्गात येताना आवश्यक कौशल्यांची कमतरता जाणेवल त्यांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न या मोहीमेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून मुलांची विविध १२ कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक किमान गुण संपन्न करण्यास मदत मिळणार आहे. त्यामध्ये मुलांमधील शारिरीक कौशल्य, भाषा ज्ञान, रंग ज्ञान, अंक गणित, भावनिक ज्ञान आदी गुण तपासले जाणार आहे.
त्यांच्या वाढीसाठी मुलांना विविध १२ प्रकारचे उपक्रम दिले जाणार आहेत. यामाध्यमातून त्यांच्या ज्ञानात भर घातली जाणार आहे. पालकांच्या मदतीने पहिलीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी ही कौशल्ये मुले शकतील यादृष्टीने शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. याद्वारे दोन टप्प्यात प्रत्येक शाळेत मेळावे घेऊन हा उपक्रम राबविण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. त्यातील पहिला मेळावा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घेतला जाणार आहे. तर दुसरा मेळावा शाळा सुरु होण्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. यातून सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या यंदाही २ लाख ५० हजारांनी वाढेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
‘गेल्या वर्षी पहिल्यांदा हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या २ लाख ४८ हजारांनी वाढली. यंदाही हा उपक्रम राबविला जाणार असून विद्यार्थीसंख्या २ लाख ५० हजारांनी वाढेल’, अशी आशा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलाश पगारे यांनी व्यक्त केली.