Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधारजोडणीत नापास मुख्याध्यापकांवर कारवाई

34

मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या संच मान्यतेसाठी सरल प्रणालीवरील आधार जोडणी केलेली विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र, पालिकेच्या अखत्यारितील अनेक शाळा आधार जोडणीत पिछाडीवर आहेत. बऱ्याचशा शाळांतील ५० टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांचीच आधार जोडणी झाली आहे. त्यामुळे या शाळांच्या मुख्याध्यापकांवर दोषारोप निश्चित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून पालिकेच्या शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. पालिकेने कारवाईसाठी आधार जोडणीत पिछाडीवर असलेल्या शाळांची यादी सादर करण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आधारची सरल प्रणालीवर जोडणी करण्याचे काम ९० टक्क्यांपुढे गेले आहे. मात्र, त्याचवेळी मुंबई पालिकेच्या अखत्यारितील शाळा आधार जोडणीत सर्वात तळात आहेत. यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. परिणामी आधार जोडणीचे काम पूर्ण करावे यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना ‘मेमो’ बजावले होते. मात्र, तरीही आधार जोडणीचे काम संथगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शिक्षण विभागाने कठोर धोरण अवलंबले असून, मुख्याध्यापक आणि इनचार्ज शिक्षक यांना जबाबदार धरून विभागीय कारवाईचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे पत्र पालिकेने ५० टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांच्या आधारची जोडणी झालेल्या शाळांतील मुख्याध्यापकांना पाठविले आहे. आता २९ मेपर्यंत आधार जोडणीचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत पालिकेने दिली आहे. तसेच ज्या शाळांनी अपेक्षित कामे पूर्ण केली नाहीत त्यांची नावे शिक्षण निरीक्षकांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेकडून त्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर मनपा नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील सरकारी, खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची आधारसह माहिती गेल्यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत सरल प्रणालीवर भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड उपलब्ध नाही. काहींच्या आधारकार्डातील माहिती विसंगती, तर काहींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शिक्षण विभागाने ३० एप्रिलला संच मान्यता अंतिम करण्याचे निश्चित केले होते.

मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही आधार जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने अंतिम संच मान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. आता ज्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम झाले आहे, त्या शाळांना संच मान्यता देण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र, पालिकेच्या शाळा अद्यापही मागे असल्याने त्यांना शिक्षकांची पदे कमी मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेच्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.