Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकेकाळी भूमिहीन असणारा हा कातकरी तरुण आदिवासींसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कारण हा प्रवास संघर्षाचा, जिद्दीचा, मेहनतीचा आणि तितकाच प्रामाणिकपणाचा आहे. एकेकाळी कातकरी समाजातील भूमिहीन शेतमजूर सुनील पवार दुसऱ्यांच्या बागायतींमध्ये मोलमजुरी करत होता. त्याचा कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा पाहून एक सदृदयी व्यक्तीने त्याला मदतीचा हात दिला. दिलेल्या हाकेला अचूक प्रतिसाद देत शेतमजूर म्हणून राबणाऱ्या सुनीलने तब्बल स्वतःच्या २२ गुंठे जमिनीमध्ये आंबा, काजू, माड, सुपारी, अननस, चिकू अशा झाडांनी बहरलेली बाग फुलवली आहे. त्याचा भूमिहीन शेतमजूर ते बागायतदार हा प्रवास अत्यंत संघर्षाचा, कष्टाचा, जिद्दीचा आणि प्रामाणिकपणाचा ठरला आहे.
आदीवासी बांधव इतरांच्या शेती, बागायतींमध्ये राबून पोटप्रपंच चालवतात. त्यापैकीच एक सुनीलदेखील. शिक्षण नावाचा प्रकार गेल्या दहा-पंधरा वर्षांपासूनच त्यांच्या वाट्याला आला. साहजिकच अन्य आदीवासी बांधवांप्रमाणे सुनीलदेखील एकही इयत्ता शिकलेला नाही. तरीही सुनीलच्या नावावर तब्बल २२ गुंठे जमीन आणि त्यामध्ये विस्तीर्ण बागायत, छोटेखानी घरासोबत दहा-बारा शेळ्या, कोंबड्या आदी ‘प्रॉपर्टी’ आहे, हे नक्कीच लक्षणीय आहे. ३० वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या एका भागातून कणकवलीत दाखल झालेल्या सुनीलचे वास्तव्य होते. कणकवलीतील गणपतीसाना या भागातील झोपडीमध्ये अनेक कातकरी बांधव तेथे आजही झोपड्यांमध्ये राहतात.
एकेकाळी कणकवली शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सुनीलने आज स्वतःच्या २२ गुंठे बागेमध्येच एका कोपऱ्यात छोटसं दोन खोल्यांचं चिरेबंदी घर बांधले आहे. या घरामध्ये तो त्याच्या कुटुंबासह राहत आहे. उजाड माळरान असलेल्या या जागेमध्ये सुनीलने आंबा, काजू आदी झाडांची लागवड केली आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सुनीलने स्वतः कुटुंबीयांसह कष्ट घेत या जागेत विहीर देखील बांधली आहे. त्या विहिरीचे पाणी तो बागायतीसाठी पाईपलाईन द्वारे पुरवतो. त्याचबरोबर त्याने शेळी पालन देखील सुरू केले आहे. भूमी नसल्याने जमीन नावावर करण्यासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागला होता. मात्र यावर देखील त्याने मात करत या जागेचा सातबारा आता स्वतःच्या नावे मिळवला आहे.
सुनीलला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण त्याने सुरू ठेवले आहे. मात्र बागायतीसाठी आणि घरासाठी अद्याप वीज पुरवठा झाल्या नसल्याची खंत तो व्यक्त करतो आहे. आम्ही अशिक्षित आणि अडाणी राहिलो यामुळे दुसऱ्यांच्या बागा आणि शेतामध्येच राबत राहिलो होतो. पण आमची पुढची पिढी मात्र सुशिक्षित, सरकारी नोकरदार, व्यावसायिक किंवा बागायतदार बनावी, असे स्वप्न सुनील पाहत आहे. सुनीलचा हा जीवनप्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.