Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लासूर स्टेशन येथे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील मंजूर करून आणलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव जाधव, गंगापूरचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
आमदार प्रशांत बंब म्हणाले, ‘गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील ६९ गावांसाठी घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेअंतर्गत २४ तास थ्री फेज वीज मिळणार असल्याने या भागातील भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येबाबत दिलासा मिळणार आहे. गंगापूर खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांना थ्री फेज फिटरमधून गावांना सिंगल फेज विद्युतपुरवठा केला जातो. यामुळे वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. बऱ्याच गावांमध्ये घरगुती वापराची अखंडित वीज मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजना राबविण्यात येते. त्यातून गंगापूर – खुलताबाद मतदारसंघातील गावांना थ्री फेज लाइट मिळणार आहे. एबी केबलद्वारे ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार असल्याने वीजचोरी होणार नाही. ही वीज थ्री फेज स्वरूपात २४ तास उपलब्ध राहणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर तालुक्यातील ६९ गावांत २४ तास थ्री फेज वीज उपलब्ध राहणार आहे,’ अशी माहिती बंब यांनी दिली.
‘जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नदीनाल्यांचे खोलीकरण झाल्यामुळे विहिरींना, नद्यांना आणि तळ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. नुकतेच भूमिपूजन झालेली गंगापूर उपसा जलसिंचन योजना अशा विविध योजनांमुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यातून शेतीसाठी शेतकऱ्यांची तथा औद्योगिक आणि इतर ग्राहकांची वीज मागणी वाढणार आहे. भविष्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन गंगापूर खुलताबाद मतदार संघात राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदारसंघात महावितरणाचे जाळे विणले जात आहे,’ असेही बंब म्हणाले.
‘मागील ४८ वर्षांत जितके काम झाले नाही. तितके काम मागील काही वर्षांत मंजूर करून २५० कोटींच्या कामांना मंजुरी मिळवली आहे. त्यातून प्रत्यक्ष ८५ कोटी रुपयांची गावठाण फीडरची कामे सुरू असून, आणखी २१४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीसाठी दाखल केला आहे. येत्या मार्च महिन्यात त्यास मंजुरी मिळेल,’ अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
बोरुडी, भिवधानोरा, मालुंजा, काटेपिंपळगाव, मांजरी आरापूर व दहेगाव मुरमी या ठिकाणी नवीन ३३ केव्ही चे उपकेंद्र मंजूर केले. यामुळे शेतकरी औद्योगिक व घरगुती ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी रात्री ऐवजी दिवसा बारा तास सौरउर्जेवर वीजपुरवठा मिळावा यासाठी उपकेंद्राअंतर्गत सौर प्रकल्पासाठी मंजुरी मिळावी त्यासाठी जागेची चाचपणी सुरू असून, लवकरच तोही प्रकल्प मार्गी लावण्यात येईल.
मागील ४८ वर्षांत ‘महावितरण’च्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत जी कामे अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी करायला हवी होती, ती मागील १४ वर्षांत आपण मंजूर करून आणली आहे. खुलताबाद तालुक्यात १३२ केव्हीचे फक्त एकच उपकेंद्र होते. आता बाजारसावंगी येथे नवीन १३२ केव्हीचे उपकेंद्र शासनस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कसाबखेडा निरगुडी येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र मंजूर केले आहे.-प्रशांत बंब, आमदार