Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गुंटूरची लाल मिरची जगभर प्रसिद्ध आहे. मतदारसंघात फिरताना जागोजागी रचून ठेवलेले मिरचीचे साठे लक्ष वेधून घेतात. पावसाच्या आगमनाआधी साठे सुरक्षित करण्यासाठी सुरू असलेली लगबग, प्रचंड ऊन आणि त्यात तापलेले राजकीय वातावरण असे चित्र पाहावयास मिळते.
गुंटूर लोकसभा निवडणूक यंदा देशभर चर्चेत आहे, ती ‘डीडीपी’च्या उमेदवारामुळे. पाच हजार कोटींची संपत्ती असलेले देशातील श्रीमंत उमेदवार म्हणून डॉ. चंद्र. एस. पेम्मासानी चर्चेत आहेत. त्यांच्या विरोधात ‘वायएसआर काँग्रेस’ने आमदार किलारी वेंकट रोसय्या यांना उमेदवारी दिली आहे. पेम्मासानी अनिवासी भारतीय (एनआरआय)आहेत. स्थानिक विरुद्ध एनआरआय असा रंग या निवडणुकीत भरला आहे.
गुंटूर तंबाखू व्यवसायासाठीही प्रसिद्ध आहे. एका बाजूला समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूने रायलसीमा असे भौगोलिक चित्र आंध्रात आहे. मागील दोन निवडणुकीत ‘टीडीपी’चे गल्ला जयदेव विजयी झाले होते. यंदा त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. परिणामी ‘टीडीपी’ने पेम्मासानींना रिंगणात उतरविले आहे. त्यांचे विरोधक वेंकट रोसय्या हे ‘वायएसआरसीपी’चे आमदार आहेत. मिरची मार्केटचे अध्यक्षपद म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. परिणामी शहरी व ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे ‘इंडिया’ आघाडीच्या कोट्यातून जंगला अजय कुमार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर गुंटूरवासीयांना यावेळी लोकसभेची तिरंगी लढत पाहावयास मिळत आहे.
श्रीमंत उमेदवाराचा मतदारसंघ
विद्यमान खासदार गल्ला जयदेव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. २०१९ च्या निवडणुकीत अमर राजा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक असलेले जयदेव यांनी ६८० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. श्रीमंत उमेदवाराचा मतदारसंघ अशी गुंटूरची प्रतिमा असल्याचे किराणा दुकान व्यावसायिक सुनील रेड्डी यांनी सांगितले.