Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांत अनेक तास झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्रिसूर जिल्ह्यातील सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) त्रिसूर, मल्लपुरम आणि कोळिकोड या जिल्ह्यांना शनिवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला. इडुक्की, पलक्कड आणि वायनाडमध्ये ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी करण्यात आला असून, सहा जिल्ह्यांमध्ये ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
इडुक्की जिल्ह्यात शुक्रवारी रात्री भूस्खलन झाल्याची; तसेच झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळाली. यात काही घरे आणि वाहनांचे नुकसान झाले; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. वडावथूर भागात शुक्रवारी रात्री १०० मिलिमीटर पाऊस पडला असून, कोट्टायमच्या शहरी भागांत ९९ मिलिमीटर पाऊस झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
साडेतीन लाख लोक बाधित
गुवाहाटी : ‘आसाममधील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले असून, यामुळे ११ जिल्ह्यांमधील साडेतीन लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर झालेल्या संततधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील रस्ते आणि रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे,’ असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
कचार जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, येथील सर्व शैक्षणिक आस्थापना शनिवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. ‘कार्बी आंगलाँग, धेमाजी, होजई, कचार, करीमगंज, दिब्रुगढ, नागाव, हैलाकांडी, गोलाघाट, पश्चिम कार्बी आंगलाँग आणि दिमा हासाओ आदी जिल्ह्यांमधील लोक प्रभावित झाले आहेत,’ अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
जवळपास ३० हजार लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. कचार जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख १९ हजार ९९७ लोक प्रभावित झाले असून, त्यानंतर नागाव (७८,७५६), होजई (७७,०३०) आणि करीमगंज (५२,६८४) आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
ऐजॉल : ‘मिझोराममध्ये कोलासिब जिल्ह्यातील त्लांग नदीत एका ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने येथे झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वनलालरुअली असे या महिलेचे नाव असून, ती आणि तिचा पती दुर्घटनेत बेपत्ता झाले होते. इतर पाच बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. या ठिकाणी गेल्या मंगळवारी भूस्खलन होऊन २१ जणांचा मृत्यू झाला होता.