Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्मी मेडिकल कोर, २६वी बटालियन, पंजाब रेजिमेंटचे कॅप्टन अंशुमन यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात एका भीषण आगीतून लोकांची सुटका करताना प्राणांचे बलिदान दिले होते. हुतात्मा अंशुमन यांना ‘कीर्ती चक्र’ हा शांतता काळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य सन्मान शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोत्तर प्रदान करण्यात आला. वीरपत्नी स्मृती यांनी सासूबाई मंजू सिंह यांच्या साथीने हा सन्मान स्वीकारला. ‘स्वत:च्या सुरक्षेची पर्वा न करता, भीषण आगीतून अनेकांना वाचवताना कॅप्टन अंशुमन यांनी अतुलनीय शौर्य दाखवले,’ असे राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्मृती यांनी कीर्ती चक्राचा स्वीकार केल्यानंतर, अंशुमन यांच्यासोबतची पहिली भेट, त्यांची धाडसी वृत्ती या विषयीच्या आठवणी जागवल्या. त्यांचा हा व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ‘एक्स’वर शेअर केला. ‘कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आमची भेट झाली होती. मला नाट्यमय काही सांगायचे नाही, पण पहिल्या नजरेतच आमचे प्रेम जुळले. त्यानंतर एका महिन्यात त्याची आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाली. तो खूपच हुशार होता. एका महिन्यांच्या भेटीगाठींच्या बळावर पुढची आठ वर्षे आम्ही परस्परांपासून दूर राहून नातं सांभाळलं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला,’ असे स्मृती यांनी सांगितले.
‘दुर्दैवाने लग्नानंतर दोन महिन्यांतच त्याची सियाचेन येथे नियुक्ती झाली. १८ जुलैला आमचे फोनवर दीर्घकाळ बोलणे झाले. पुढच्या ५० वर्षांत काय काय करायचं, घर बांधायचं, मुलांना जन्म द्यायचा, असं काय काय आम्ही बोललो. पण १९ तारखेला तो आता नाही, हे सांगणारा कॉल आला,’ असे सांगताना स्मृती यांना अश्रू अनावर झाले. ‘तो गेला ते अजूनही खरं वाटत नाही. पण आता कीर्ती चक्र हातात बघितल्यावर लक्षात आलं की, हे खरं आहे. पण तो आमचा हिरो आहे. त्याने एवढी मोठी कामगिरी सांभाळली की, आता आम्ही आमचं आयुष्य सांभाळून घेऊ. इतर तीन कुटुंबांना वाचवण्यासाठी त्याने स्वत:चे प्राण आणि कुटुंब यांचा त्याग केला,’ अशा शब्दांत वीरपत्नी स्मृती यांनी अभिमानाची भावना व्यक्त केली.
राष्ट्रपती मूर्मू यांनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन करणाऱ्या १० जवान – अधिकाऱ्यांना कीर्ती चक्र हा सन्मान प्रदान केला. यापैकी सात जणांना हा सन्मान मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.