Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून लढले आणि ६७ हजार ४२७ मतांनी विजयी झाले. निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिलेच होते. पण लोकसभा निवडणुकीत आदित्य यांच्या मतदारसंघातून ठाकरेसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना केवळ ६ हजार ७१५ मतांची आघाडी मिळाली. लोकसभेत ठाकरेसेनेचं वरळीत घटलेलं मताधिक्क्य पाहून मनसेनं आदित्य यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांना मनसेकडून तिकीट दिलं जाऊ शकतं. ते गेल्या काही दिवसांपासून वरळीत सक्रिय झाले आहेत.
एकीकडे संदिप देशपांडे सक्रिय झालेले असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पोलीस कॉलनी, बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. वरळीतील पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही भेट मनसेच्या निवडणूक तयारीचाच भाग मानला जात आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं अधिकाऱ्यांना वरळीशी संबंधित प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचे आदेश दिले. वरळीतील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे नेते संदिप देशपांडे लोकांशी थेट संबंध ठेवून आहेत. २०१९ मध्ये मनसेनं विधानसभा निवडणुकीत वरळीत उमेदवार दिलेला नव्हता. उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य निवडणूक लढवत असल्यानं, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं राज यांनी वरळीत उमेदवार दिला नव्हता. आदित्य ठाकरे ही निवडणूक ६२ हजार २४७ मतांनी जिंकले होते.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून ठाकरेसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव झाला. सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये सावंत जाधवांच्या पुढे राहिले. यापैकी सर्वात कमी मताधिक्क्य त्यांना ठाकरेंच्या मतदारसंघात मिळालं. हीच स्थिती पाहून मनसेनं आदित्य यांना वरळी मतदारसंघात घेरण्याची रणनीती आखली आहे.
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेनं वरळीत ३० ते ३३ हजार मतं मिळवल्याचं संदिप देशपांडे सांगतात. आदित्य ठाकरे सामान्य मतदारांना भेटत नाहीत. लोकांना त्यांच्यासाठी कायम उपलब्ध असलेला आमदार हवाय, असं देशपांडे म्हणाले. आदित्य ठाकरेंना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा मनसेचा प्लान आहे. तसं झाल्यास आदित्य यांना प्रचारासाठी राज्यभरात जाता येणार नाही. त्याचा परिणाम ठाकरेसेनेच्या कामगिरीवर होऊ शकतो.