Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Puranatil Pramkartha: पुराणात अशा काही कथा आहे ज्या आपल्याला प्रेम कसे असावे तसेच प्रेम कसे करावे याबद्दल सांगतात. पुराणातील या कथांमधून व्यक्त झालेले प्रेम आपल्याला प्रेमाची खरी अनुभूती देते. त्या कथा कोणत्या जाणून घ्या.
कामदेवाची कथा
कामदेव किंवा मदन म्हणजे प्रेमाची देवता असे आपल्या पुराणात सांगितले आहे. कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. तोच पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला. कामदेवाचे वर्णन करताना असे म्हणतात, त्याचे धनुष्य आणि बाण दोन्ही पुष्पमय आहेत. त्याचे धनुष्य इक्षुदंडाचे असून त्याच्याकडे रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प आणि मोगरा अशी पाच पुष्प असणारे बाण आहेत. कामदेव बाणांनी हृदय घायाळ करतो. वसंतोत्सवात कामदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. रती ही त्याची पत्नी. ‘रूपाने अत्यंत सुंदर, अष्टबाहू, चार हातांत शंख, पद्म, धनुष्य आणि बाण आहे. जेव्हा पुराणात प्रेमाचा उल्लेख केला जातो, तेव्हा डोळ्यासमोर कामदेव-रती येतात. कामदेव-रती यांनी पुराणातील अनेक युगुलांना मदत केली.
अर्जुन आणि चित्रांगदा
पाच पांडवांची पत्नी द्रौपदी प्रत्येक पांडवांबरोबर १-१ वर्षाच्या अंतराने राहत असे. त्या वेळी द्रोपदीच्या निवासस्थानी इतर कोणत्याही पांडवांना प्रवेश दिला जात नसे. जो हा नियम मोडेल त्याने एका वर्षासाठी राज्याबाहेर रहावे अशी शिक्षा होती. अर्जुन आणि द्रोपदी यांचा एक वर्षाचा कालखंड नुकताच संपला आणि ती युधिष्ठिरा सोबत रहात होती. द्रौपदीच्या निवासस्थानी अर्जुन चुकून आपला बाण विसरला आणि ते घेण्यासाठी तिच्या कक्षात प्रवेश केला. त्याने नियम मोडला म्हणून त्याला एक वर्ष राज्याबाहेर रहावे लागले. तो इतर राज्यात फिरत असताना मणिपूर राज्यात दाखल झाला. तिथे अर्जुनाची भेट चित्रांगदाशी झाली. तिला पाहताच अर्जुन चित्रांगदाच्या प्रेमात पडला. चित्रांगदा दिसायला अतिशय सुंदर, शूरवीर पराक्रमी होती. चित्रांगदा ही चित्रवाहन राजाची लाडकी कन्या होती. जेव्हा चित्रांगदा अर्जुनाला भेटली, तेव्हा ती त्याला पाहताच त्याच्याकडे आकर्षित झाली. पण तिला जाणीव झाली की पुरुषांना आकर्षित करणाऱ्या स्त्रीत्वाचा अभाव आपल्यात आहे. तेव्हा तिने कामदेवाची प्रार्थना केली आणि कामदेवांनी तिला मदत केली. तिचे रुपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये केले. त्या नव्या रुपाने चित्रांगदाला आत्मविश्वास मिळवून दिला आणि ती सहजपणे अर्जुनाचे मन जिंकू शकली. जेव्हा मणिपूरवर शत्रूने हल्ला केला तेव्हा चित्रांगदा युद्धात उतरली. तिने शत्रूचा संहार करून आपल्या राज्याचे रक्षण केले. तेव्हा चित्रांगदाचे ते योद्धा रूप अर्जुनासमोर आले. तिचे शौर्य, कौशल्य आणि सामर्थ्याने तो प्रभावित झाला. तिच्या बाह्यरुपापेक्षा तिचे अंतर्मन अधिकच तेजस्वी आहे याची जाणीव अर्जुनाला झाली, अशा प्रकारे कामदेवामुळे अर्जुन आणि चित्रांगदा एकत्र आले.
पिंगळा – कथा एका गणिकेची
विदेहा या प्राचीन शहरात पिंगळा नावाची गणिका राहत होती. दिसायला अतिशय सुंदर, रुपवती. तिच्या मादक सौंर्दयावर अनेक राजे, व्यापारी फिदा असायचे. अनेक जण तिच्याकडे येत आणि तिच्या रुपावर धनदौलत-संपत्तीची उधळण करत. पिंगळाने पण आपल्या सौंर्दय आणि कलाकौशल्याच्या जोरावर खूप संपत्ती जमा केली होती. अनेक इच्छा आकांशा तिने पूर्ण करून घेतल्या होत्या पण आयुष्यात तिला खरं प्रेम कधीच मिळालं नाही. सगळीकडे फक्त व्यवहारिकता दिसून येत होती. मात्र एकदा काय झालं, एका तरुणावर पिंगळाचा जीव जडला. तिच्या प्रेमभावनांना त्याने खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला. त्या राजकुमाराने पिंगळाला भेटण्याचे वचन दिले. तो दिवस उजाडला, आज पिंगळा खूप खूश होती कारण तो राजकुमार भेटायला येणार होता. ती छान सजली होती. ठेवणीतले दागिने घातले होते. अत्तराचे फवारे, फुलांच्या पायघड्या सगळी कशी छान तयारी केली होती. पिंगळा राजकुमाराची वाट पाहत होती पण खूप वेळ झाला तो आला नाही. तिला वाटलं काही कारणामुळे उशिर झाला असेल; पण सुर्यास्त होत आला तरी राजकुमाराचा काही पत्ता नव्हता. रात्रभर त्याची वाट बघत तळमळत ती बसली त्यात रात्र कधी सरली ते कळलंच नाही. सुर्याची पहिली किरणे तिच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा तिला जाग आली. तिच्या लक्षात आलं की, आपण रात्रभर बाहेर बसलो होतो पण तो काही आला नाही आणि आता येणारही नाही. तो राजकुमार येणार ही आशा पिंगळाने सोडून दिली, त्यावेळी तिचं तळमळणारे मन शांत झाले. ती विचार करू लागली, जे होणार नाही त्याचा विचार किंवा अपेक्षा करून आपल्याला दुःखच मिळणार. त्यापेक्षा त्याचा त्याग करणे जास्त उत्तम आहे असे म्हणत ती घरात येवून शांतपणे आराम करू लागली.
पिंगळाची कथा वाचून ती प्रेमकथा कशी काय होवू शकते असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण पिंगळाची गोष्ट आपल्याला अध्यात्मिक शिकवण देऊन जाते. प्रेम आणि वासना आपल्याला चांगलं आणि वाईट अशी दोन्ही कृती करण्यासाठी प्रेरीत करतात. मात्र जेव्हा सर्वांना आपण अध्यात्मिक नजरेने पाहतो त्यावेळी खरं प्रेम किंवा सुख कशात आहे याची प्रचिती आपल्याला येते. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून ती ओरबाडून घेणे किंवा तिची आसक्ती ठेवणे यामुळे मनाला त्रासच होतो. त्या त्रासातून मुक्ती हवी असेल तर त्याग करणं योग्य आहे. तेच खरं सुख म्हणायला हवं.
