Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नांदेड, दि. १५ : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल नांदेडकरांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवकथाकरांपासून ते मराठीच्या प्राध्यापकांपर्यंत सर्वांनाच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा अभिमान आहे. नांदेड मुलखातून मोठ्या संख्येने मराठी साहित्यिक दिल्लीच्या संमेलनात सहभागी होणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उत्सव अभिजात मराठीचा हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत माध्यमांच्या सर्व आयुधातून दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. काही बोलक्या प्रतिक्रिया खास मराठीप्रेमी वाचकांसाठी..
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्यिक, लेखक, वाचकांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. नवोदीत कवी, कथाकार, कांदबरीकार, लेखक यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.
मराठी भाषेला जागतीक कीर्ती मिळावी, जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष व्हावा, यासाठी हे साहित्य संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे.या साहित्य संमेलनात साहित्य, भाषा आणि संस्कृती याबाबत चिंतन होणार असून, विविध चर्चासत्रे, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक, प्रकाशक, लेखक यांनी आपल्या प्रतिक्रीया व शुभेच्छा दिल्या आहेत. त्या प्रतिक्रीया पुढीलप्रमाणे आहेत.
मराठी माणसाने मराठी माणसासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या संमेलनाने हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना मराठीतूनच शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या पाल्यांना मराठी कवी संमेलने, कार्यक्रमांना आवर्जून नेले पाहिजे. यामुळे मुलांमध्ये मराठी भाषा अधिक वृद्धींगत होईल आणि त्यांना आवड निर्माण होईल. मराठी भाषा अधिक संवर्धित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- आम्रपाली रामराव भद्रे, सहाय्यक प्राध्यापक, सावित्रीबाई फुले महिला अध्यापक महाविद्यालय,सिडको
मी नांदेड येथून मागील ५० वर्षांपासून मराठी वाङ्मयीन 800 पुस्तके प्रकाशित केली आहेत. यावर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तो मिळणे ही बाब आमच्यासारख्या मराठी भाषिकांना आनंदाची व अभिमानास्पद आहे. पुणे व इतर शहरातून अनेक प्रकाशक 98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाणार असून जिल्हा पातळीवरुनही अनेक प्रकाशक, लेखक, साहित्यिक दिल्लीला जाणार आहेत. नांदेड येथील निर्मल प्रकाशनही याठिकाणी जावून स्टॉल लावणार आहे.

- श्री. निर्मलकुमार सुर्यवंशी,प्रकाशक, निर्मल प्रकाशन
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच होणारे हे अ.भा. मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे मराठी भाषिक, लेखक, वाचकांना ऐतिहासिक ठरणार आहे. हे संमेलन नवोदित साहित्यिकासाठी एक नवी वाटचाल किंवा त्याला प्रस्थापित होण्यासाठीचा एक नवा मार्ग असणार आहे. या साहित्य संमेलनामुळे नवोदित कवी, कथा -कांदबरीकार, लेखकांना एका व्यापक व्यासपीठ मिळून, एका नवीन युगाला सुरवात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळावा. जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष, गजर व्हावा, जागतिक पातळीवर कीर्ती मिळावी, अशी अपेक्षा आहे.

- राम तरटे, ग्रामीण कथाकार
केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे हे साहित्य संमेलन होत असल्याबाबत विशेष आनंद आहे. 98 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नांदेड येथून अनेक साहित्यिक जाणार आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक महामंडळे स्थापन केली. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची आठवण केली जाईल. संमेलनाला येणाऱ्यांना मराठी भाषिक ग्रंथ पाहाण्यास व वाचण्यास उपलब्ध होणार आहेत

- नारायण शिंदे, लेखक
०००