Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
संताची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, संत जनाबाई, सोयराबाई यांच्या माध्यमातून १२ व्या शतकापासुन आजपर्यंत येथे मराठी भाषा रुजली. अभंग त्यांचे उपदेश आजच्या युगातही समाजाला मार्गदर्शक ठरतात. पुढे मराठीला अनेक जणांनी विविध माध्यमातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणता येईल…
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि मराठी भाषा
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म १२ जुलै, १८६४ चा आणि मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले ११ मे, १८७८ रोजी. येथून मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सुरु झाली.
राजवाडे पुण्यात बीए उत्तीर्ण झाले. डेक्कन आणि एलफिस्टनमध्ये त्यांनी नोकरी केली. डेक्कनमध्ये त्यांनी इंग्रजी विषयाचा अभ्यास केला. ते सर्वभाषा तज्ज्ञ होते. इंग्रजी, पारसी, मोडी, गणित, विज्ञान, मराठी यासह त्यांनी कोपर्निकस, आर्थेलो टेनीसन, शेक्सपीअर, रसेल असे नामांकित लेखक आणि कवी यांचा अभ्यास केला होता. त्यांचे भांषातर करावे म्हणुन राजवाडे यांनी भांषातर मासिक सुरु केले. या सर्वाचे मराठी भांषातर करुन त्यात ते प्रसिध्द करीत असत. परंतु, विष्णुशास्त्री चिपळुणकरांची निंबधमाला राजवाडे यांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी इंग्रजी लिखाण बंद केले. ज्याला माझ्या लिखाणाची आवड, वाचन, गरज असेल त्यांनी मराठी वाचावे. अशी जणू प्रतिज्ञा केली आणि त्यांचे लिखाण मराठीत सुरु झाले. त्यांचे मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड त्यांच्या हयातीतच प्रकाशित केले. हे इतिहासाचे प्रचंड काम त्यांनी करुन ठेवले. आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. हे कौतुक पहावयास राजवाडे नाहीत. त्यांना इंग्रजीची चीड होती, असे म्हणून चालणार नाही. त्यांना स्वातंत्र्य हवे होते. कारण ते त्यांच्या चरित्रात खंत व्यक्त करतात की, आजची तरुण पिढी स्वातंत्र्यासाठी का लढत नाही. कारण ते जिथे शिकले तेथे इंग्रजी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. तो काळ पारतंत्र्याचा होता.
त्यांनी इतिहास हा इंग्रजीत लिहीला असता तर राजवाडे परदेशातही खूप प्रसिद्ध झाले असते, म्हणून ते म्हणतात मला प्रसिद्धीची हाव नाही. ज्याला गरज असेल तो माझे मराठीतील साहित्य वाचेल. ज्ञार्नाजनाची हौस असेल तर पाश्यात्य लोक माझी मराठी भाषा शिकतील, मी कीर्तिसाठी हपापलेला नाही.
राजवाडे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही, याचे मात्र दु:ख होते. पण त्याची राजवाडे यांना पर्वाही नव्हती.
न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन पुणे येथे ११ मे १८७८ रोजी पुणे येथे भरले होते. न्यायमुर्ती रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या प्रेरणेने साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. ग्रंथकारांनी भरपूर ग्रंथ लिहावे व वाचकांनी भरपूर वाचन करावे, हाच याचा मुख्य हेतू होता.
दुसरे साहित्य संमेलन २४ मे, १८८५ रोजी सार्वजनिक संस्थेच्या जोशी सभागृहात झाले. वेदशास्त्री कृष्णशास्त्री राजवाडे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. यावेळी महात्मा जोतिबा फुले, जंगली महाराज, डॉ. कानोबा रामछोडदास, महादेव चिमणाजी आपटे यांनी काही सूचना पाठविल्या होत्या.
कादंबरी, कथा, कविता, गझल याचा सगळा सार ग्रंथातच असतो. ग्रंथ वाचन करताना सुख दु:खाच्या गोष्टी कळतात. नवी पिढी, युवकांपर्यंत मराठी साहित्याबद्दल अधिक जवळीकता निर्माण व्हावी. सकारात्मता निर्माण व्हावी आणि वाचन चळवळ वाढावी या उद्देशाने 98 व्या साहित्य संमेलनात चर्चासत्रेही होणार आहे.
आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारताच्या प्रमुख भाषांमध्ये आता मराठी सन्मानाने विराजमान झालेली आहे. मराठीच्या दृष्टीने या साहित्य संमेलनातून निश्चितच काही तरी चांगले यश मिळेल असे वाटते.
तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सन १९०५ या वर्षी झाले. या दरम्यान २० वर्षांचा कालवधी गेला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब करंदीकर होते. चौथे संमेलन पुणे येथे झाले. वि. वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील मडगाव येथे १९६४ मध्ये संमेलन झाले. १९६५ मध्ये वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे साहित्य संमेलन झाले. लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. का. राजवाडे यांना मात्र संमेलनाध्यक्षपद मिळाले नाही.
पहिल्या २७ वर्षात तीन संमेलने झाली. नंतर 1909 ते 1926 दरम्यानही संमेलने झाली नाहीत. पुढे मात्र एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता संमेलने नियमित भरु लागली.
साहित्य संमेलने आजही महत्त्वाची आहेत. यामुळे विविध ग्रंथांची माहिती मिळते. वाचनप्रेमींकडून ग्रंथाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. विचारांचे आदान प्रदान होते, चर्चासत्रे होतात याचा फायदा होतो.
2027-28 मध्ये वि. का. राजवाडे यांची १०० वी पुण्यतिथी आहे त्या पार्श्वभूमीवर १०० वे साहित्य संमेलन धुळे येथे व्हावे, अशी अपेक्षा आहे.
०००
- श्रीपाद नांदेडकर, माजी जिल्हा माहिती अधिकारी, 9833421127