दरम्यान, गुरुवारी कर्जत तालुक्यात एक तरुण उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात पडला. प्रवाहात तो वाहत जात असताना देखील त्याने वाचण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात पोहत राहिला आणि एका ठिकाणी अडकून पडला. तेव्हा प्रशासनाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने पुराच्या पाण्यात उतरत या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले आहे. या तरुणासाठी हे बचाव पथक देवदूत ठरले आहेत.
तर दुसरीकडे गुरुवारी दुपारी दोन इसम बारावी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये टाकीची वाडी येथून वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच अग्निशामक दलाच्या जवानांकडून घटनास्थळी शोधकार्य सुरू केले होते.
रायते पुलावर डांबर वाहून गेले…
गुरूवारी रौद्र रूप धारण करणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळीत शुक्रवारी घट दिसून आली. उल्हास नदीची पाणी पातळी सकाळी १४.७० मीटर इतकी होती. त्यामुळे बदलापूर शहरावरचे पूर संकट टळले आहे. गुरुवारी उल्हास नदी आहे १८.८० मीटर इतकी सर्वोच्च पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर रायते येथील पुलावर पाणी साचल्याने गुरुवारी वाहतूक ठप्प होती. शुक्रवारी सकाळी पाणी ओसरल्यावर पुलावर खड्डे पडले असून डांबर वाहून गेले आहे. कठडे तुटल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता.