एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या की माझं लग्न जुळवण्यात बाबांचा झिरो रोल होता. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरे यांचा रोल अधिक होता, असं त्या म्हणाल्या.
शरद पवार म्हणाले, की प्रॅक्टिकली माझी भूमिका शून्य होती. माझ्या जवळच्या मित्रांनी सदानंद सुळे यांचं स्थळ सजेस्ट केलं होतं. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्योजक माधव आपटे असतील. माझ्या जावयाचे वडील (म्हणजे शरद पवार यांचे व्याही) आणि आपटे कदाचित मित्र होते. आमच्या मित्रांनी सजेशन दिलं, मग सुप्रिया आणि सदानंद हे दोघं भेटले. जवळचे लोक सुचवतील तो जावई, असं माझं ठरलेलं, असं शरद पवार म्हणाले.
लेकीच्या लग्नात पवार रडलेले का?
शरद पवारांचा स्वतःच्या भावनांवर कंट्रोल आहे, परंतु सुप्रिया सुळे यांच्या लग्नात वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं का, असं विचारलं असता, सुप्रिया सुळेंनी “मला माहिती नाही, पण असं आई तरी म्हणते” असं उत्तर दिलं. मात्र शरद पवारांनी हात वर करत आपण भावनिक झाल्याचं सांगितलं.
दरम्यान, वडिलांच्या हातून कधीच मार खालला नाही, ते साधं ओरडलेही नाहीत. ते डिपार्टमेंट आईकडे होतं. ती मारायची, पाय मारल्याचं आठवत नाही, पण हाताने, पट्टीने आईने मारलंय, असं सुप्रिया सुळे गमतीने म्हणाल्या.
शरद पवार हे फुल टाईम आजोबा आहेत. ते नातीशी फुल कनेक्ट आहेत. रेवती सुळे यांना माहिती असतं, की आजोबा इथे गेले, तिथे गेले, यांना-त्यांना भेटले, मलाही माहिती नसतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.