शरद पवार दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी ‘एमजीएम’मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भाजपच्या मेळाव्यातून केली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही ओबीसी आरक्षणाबद्दल आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘दोन समाजांमध्ये तेढ वाढत आहे, याची मला काळजी आहे. त्याबरोबर दोन-तीन जिल्ह्यांत अशी परिस्थिती अधिक आहे, याबद्दल काळजी घेणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या मुद्याबद्दल मुख्यमंत्र्यांशीही माझी चर्चा झाली. हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी सरकारने जनतेमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे; परंतु सरकार असे न करता सरकारमधील एक गट जरांगे यांच्याशी चर्चा करीत आहे. दुसरा गट ओबीसींच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहे, तर काही जणांना वेगळे ठेवले जात आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे.’
‘तो’ दिवा तरुंगात पाहिला
शरद पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना ‘तडीपार’ असा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे, असे म्हटले. याबद्दल पत्रकारांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘त्यावेळी ‘तो’ दिवा आम्ही महाराष्ट्रातील तुरुंगात पाहिला होता.’