महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कल्याण पूर्व जागेवर भाजपचाच दावा असून शिवसेनेची इच्छा असेल तरी आम्ही सोडणार नसल्याचेच अप्रत्यक्ष संकेत दिले.
रवींद्र चव्हाण यांनी गणपत गायकवाड यांची बाजू उचलून धरली
गेली अनेक वर्षे या भागातून गणपत गायकवाड निवडून येतात. गणपत गायकवाड हे जनतेला आपला माणूस वाटतात. त्यामुळे स्वाभाविक तेच उमेदवार असावेत, असे जनतेला तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वाटते, असे म्हणत रवींद्र चव्हाण यांनी गणपत गायकवाड यांची बाजू उचलून धरली.
गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
या बैठकीला गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याही पाठिंब्याच्या घोषणा यावेळी दिल्या गेल्या.
इच्छा असणे यात गैर काय?
कल्याण भागात भाजपचे चांगले काम आहे तसेच पक्षसंघटनेची बांधणीही चांगली आहे. त्यामुळे साहजिक इकडे भाजपचा दावा राहणार आहे. जसे डोंबिवलीमध्ये मी अनेक वर्षांपासून निवडून येतो तसे इथून गणपत गायकवाड निवडून येतात. आता कुणाची ना कुणाची इच्छा असणार, त्यात गैर काय आहे? पण शेवटी पक्ष निर्णय घेत असतो, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.