या आरोपांवर ठाम राहत अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या त्या खास माणसाचे नाव जाहीर केले आहे. ते म्हणाले, फडणवीसांनी मिरजहून समित देशमुख याला माझ्याकडे पाच ते सहा वेळा पाठवलं होतं. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या पत्नी समित याला राखी बांधतात. तर आणखी धक्कादायक बाब म्हणजे समित यांना सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली, असा खुलासा देखील देशमुखांनी केला आहे.
माझ्याविरोधात ईडी, सीबीआयकडून कारवाई करण्यात आली. मला जेलमध्ये टाकून भाजपात घेण्याचा फडणवीसांनी अयशस्वी प्रयोग केला. दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर करण्यात आला तो यशस्वी झाला आणि नंतर तिसरा अजित पवारांवर केला, तोही यशस्वी झाला. माझ्यावर केलेला प्रयोग यशस्वी झाला असता तर उद्धव ठाकरेंचं सरकार तीन वर्षांपूर्वीच पडलं असतं, असा दावा देखील देशमुखांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि समित कदमांच्या म्हणण्याप्रमाणे जर मी अॅफिडेविट बनवलं असतं तर उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेंनाही खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं. एक तो बीजेपी मे आओ, या जेल मे जाओ असंच भाजपाचं धोरण आहे, यासाठी माझ्यावर फडणवीसांनी खूप दबाव टाकला होता, अशी टिप्पणी अनिल देशमुखांनी केली आहे.
तर मी या दबावाला मुळीच बळी पडलो नाही. खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र देण्यास मी स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच माझ्यामागे ईडी, सीबीआय मार्फत दबाव टाकण्यात आला, तुरुंगातही टाकण्यात आलं. तर फडणवीसांच्या माणसानं मला दिलेला लिफाफा माझ्याकडे आहे. याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. योग्यवेळी पुरावे समोर आणेन, असे देशमुख म्हणाले. तर मी स्वतःहून अनिल देशमुख यांना भेटायला गेलो नव्हतो तर देशमुख यांनी मला भेटायला बोलावल्यामुळेच मी गेलो होतो, असा दावा समित कदम यांनी केला आहे. यावरुन आता वातावरण चांगलेच तापले आहे. आता या वादात आणखी काय नवी माहिती समोर येते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.