ज्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली, ते नंतर शरद पवार साहेबांसोबत गेले. मग तुम्ही सुपारीबाज नाही का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला. आज तुम्ही इक्बाल चहलला नावे ठेवत आहात, पण त्यांनाच घेऊन तुम्ही करोना काळात काम करत होतात. आम्ही सुपारीबाज असू तर जनतेचे आहोत. त्यांच्या बाजूने बोलू, जनतेचे प्रश्न मांडू, असंही देशपांडे म्हणाले.
काय आहे प्रकरण?
अकोल्यात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. या वेळी शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील कुंडी उचलून मिटकरी यांच्या वाहनावर फेकणारे मनसेचे २९ वर्षीय कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात मृत्यू झाला.
मिटकरींच्या गाडीवर जय मालोकार यांनी कुंडी फेकली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. यामुळे अस्वस्थ झालेल्या मालोकार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.
अतिदडपणामुळे मालोकार यांना हार्ट अटॅक आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मनसे कार्यकर्त्यांसोबत जय मालोकार आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु त्यांच्या निधनाने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाल्याची शक्यता आहे.
मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
२६ वर्षांचा एक तरुण कोणाच्या तरी चिथावणीनंतर झालेल्या राड्यात मृत्युमुखी पडला, याचं मला अत्यंत वाईट वाटत आहे. तोही बिचारा तिथे पक्षाचं काम प्रामाणिकपणे करायला आला होता. मात्र एखादा तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अशाप्रकारे जाणं दुर्दैवी आहे. राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे, राजकारणाचा स्तर इतका खाली जाता कामा नये, अशा भावना व्यक्त करतानाच, जय मालोकारच्या कुटुंबाची मी भेट घेईन, त्याने भावनेच्या भरात ते केलं असेल, तरी कष्टाळू मायबापाच्या घरातलं लेकरु गेल्याचं वाईट वाटतं. माझी मनसे पक्ष प्रमुखांना विनंती आहे, की त्यांनी मुंबई सोडून अकोल्यात यावं, अशी पहिली प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी जय मालोकार यांच्या निधनानंतर दिली होती.