Ajit Pawar: मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा, अन्यथा…; अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी

मुंबई : महामार्गांवरील खड्ड्यांनी राज्यातील जनता त्रस्त असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी वर्गाला कडक इशारा दिला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडीओ तयार करावेत. जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोलवसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा’, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार रईस शेख, यांच्यासह नियोजन, वित्त, सार्वजनिक बांधकाम, राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग सुरक्षा विभाग आदी उपस्थित होते.

मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबईदरम्यानच्या प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाशांना दुप्पटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. बैठकीत पवार यांनी, महामार्गाच्या कामाबाबत कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत, अशी सूचना केली. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

मागील काही वर्षांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर दर्जोन्नती, रुंदीकरण, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशी विविध कामे सुरू आहेत. महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असून ते वेळीच बुजवले जात नाहीत. काम सुरू असणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यांचा दर्जा, त्यावरील खड्डे, वाहतूक नियंत्रणातील त्रुटींवर तोडगा काढणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.

‘पर्यायी रस्ता देऊनच नवीन कामे’

वाहतूककोंडीत वाहन खराब झाल्यास ते दूर करण्यासाठी ४० टनांच्या क्रेन वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी एनएचएआय आणि एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा. वाहतूककोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवावे, कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी या महामार्गावरील रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करावी. तसेच, यापुढे कामांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण असलेला पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचनाही यावेळी पवार यांनी दिल्या.
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्यानंतर ठाण्यात उद्रेक, संतप्त कार्यकर्त्यांनी पूर्व दृतगती महामार्ग रोखला!जबाबदारी म्हैसकर यांच्यावर

महामार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्याच्यादृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याचे पवार यांनी जाहीर केले. ळम्हैसकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा’, असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले.

Source link

ajit pawarDada Bhusemsrdc administrationMumbai-Nashik Highway Traffic issueमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमुंबई बातम्यामुंबई-नाशिक महामार्गराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
Comments (0)
Add Comment