राज्यात यंदा मान्सूनच्या पावसाची वेळेवर आगमन झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीसारख्या खरिपाचा हंगाम वाया जाण्याची शक्यता नाही. पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेवर सुरू आहेत. परिणामी, उडीद, मूग या कमी कालावधीच्या पिकांच्या पेरण्या वेळेत झाल्या आहेत. राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र घेतले जाते. आतापर्यंत ४९ लाख ४४ हजार ६२९ हेक्टर पेरण्या झाल्या आहेत. म्हणजेच सुमारे ११९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी त्याचे प्रमाण १०६ टक्के होते, अशी माहिती कृषी विभागाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.
राज्यात तीन लाखांवर उडीद
राज्यात तीन लाख ९३ हजार १९६ हेक्टरवर उडिदाच्या आणि दोन लाख २७ हजार ५८६ हेक्टरवर मुगाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीनपाठोपाठ राज्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. आतापर्यंत ४० लाख ६२ हजार २१६ हेक्टर (९७ टक्के) कापसाची पेरणी झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र ९९ टक्के आहे. कापसाखालील क्षेत्र सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी घटले आहे.
सर्वाधिक पेरणी पुण्यात
कोकण, पूर्व विदर्भात पावसाने उशिरा हजेरी लावली. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे दोन्ही ठिकाणी भातलावणी पूर्ण होत आहे. राज्यात १० लाख ७० हजार १३८ हेक्टर (७१ टक्के) भाताची पेरणी झाली. राज्यात सर्वाधिक १३२ टक्के पेरणी पुणे विभागात झाली असून, सर्वांत कमी ७९ टक्के पेरणी कोकण विभागात झाली. येत्या आठवडाभरात भातलावणी पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.
विभागनिहाय पेरण्यांची स्थिती
विभाग पेरणी (हेक्टरमध्ये)
पुणे १४,०९,१५४
कोकण ३२,६९,९४४
नाशिक १९,७०,७०३
कोल्हापूर ६,८९,४०५
छत्रपती संभाजीनगर २०,३६,४८३
लातूर २७,३१,३९१
अमरावती ३०,७१,१५३
नागपूर १५,९६,६४५
एकूण १,३७,८४,८७९
विभाग पेरण्यांची टक्केवारी
पुणे १३२.३१
लातूर ९८.७१
छत्रपती संभाजीनगर ९७.४३
अमरावती ९७.२२
नाशिक ९५.४५
कोल्हापूर ९४.६८
नागपूर ८०.९३
कोकण ७९.०५
एकूण ९७.०६