लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीतील उमेदवारीच्या वादावरुन चर्चेचा विषय ठरलेल्या डोंबिवलीमध्ये महायुतीत पुन्हा राजकीय संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे आज डोंबिवली येथे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभेत आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी आमचे निरीक्षक नेमलेले आहेत. शहरात पक्षबांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. पक्षाने जबाबदारी दिली तर आमची दोन्ही विधानसभेत लढण्याची तयारी आहे. आम्ही पक्षआदेशानुसार निर्णय घेणार आहोत.
भाजपाचे रविंद्र चव्हाण सध्या डोंबिवली विधानसभेचे आमदार आहेत. ते या मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार राहिले आहेत. रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात डोंबिवलींच्या नागरी समस्या सोडवल्या गेल्या नाहीत आणि विकासात्मक कामंही झाली नाहीत. यामुळे स्थानिक आमदार आणि प्रशासनाविरुद्ध मतदारसंघातील नागरिकांनी अनेकवेळा विविध माध्यमांतून निषेध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रेंनी देखील स्थानिक आमदार चव्हाणांवर टीका केली आहे, ‘गेले १४ वर्ष डोंबिवलीतील नागरिक वनवास भोगत आहेत. हा वनवास संपवण्यासाठी नवीन नेतृत्व समोर येत असेल तर त्याला लोकांनीही पाठबळ दिलं पाहिजे.’ यावरुन यंदाच्या निवडणुकीत रविंद्र चव्हाणांना आपल्याच बालेकिल्ल्यात नव्या संघर्षाला सामोरं जावं लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
डोंबिवली शहराची टप्प्याटप्प्यावर दुरावस्था झाली आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने कुठलेही काम झालेलं नाही. यातील गैरप्रकार आम्ही बाहेर काढणार आहोत. डोंबिवली व कल्याण विधानसभेत नवे नेतृत्व उभे करण्यासाठी आम्ही पूरेपूर प्रयत्न करणार आहोत, असेही म्हात्रे म्हणाले आहेत.