म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : कोरची तालुक्यातील चरवीदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. मुसळधार पाऊस सुरू असल्याने चरवीदंड ते लेकुरबोडी या गावादरम्यान असलेल्या नाल्याला पूर होता. नाल्यावर पूल नसल्याने खाटेची कावड तयार करून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत नातेवाइकांनी दोन किलोमीटरची पायपीट केली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून कोरची आणि तिथून पुढे गडचिरोलीला पोहोचल्यानंतर रुग्णालयात तिची प्रसूती झाली. मात्र प्रसूतीनंतर बाळ दगावले. गडचिरोली जिल्ह्यात पूर आणि पावसाचा फटका गर्भवती महिलांना सातत्याने बसत आहे. अतिदुर्गम भागातील आरोग्य सुविधांच्या अभावाने सुरू असलेल्या या कठीण प्रवासाबद्दल नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.जिल्ह्यात कोरची तालुक्यातील चरवीदंड या अतिदुर्गम गावातील रोशनी कमरो (वय २३) या महिलेला शनिवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आलेला होता. अशा परिस्थितीत रोशनीला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाइकांनी खाटेची कावड तयार केली. दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करीत लेकुरबोडी गावापर्यंत पोहोचले. तिथून तिला कोरचीला नेण्यात आले. मात्र डॉक्टरनी तिला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. दरम्यान हा प्रवास करत असताना बेळगाव ते पुराडा दरम्यान असलेल्या घाटामध्ये दोन ट्रक बिघाड झाल्याने उभे होते. त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर तिला रुग्णवाहिका बोलावून पुढे नेण्यात आले. या कठीण प्रवासानंतर महिला रुग्णालयात दाखल झाली. मात्र प्रसूतीनंतर जन्मलेले बाळ दगावल्याचे आढळून आले.
चरवीदंड या तिच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे डॉ. राहुल कापगते आणि आरोग्य सेविकेची ड्युटी आहे. तर पाच किलोमीटर अंतरावर नवेझरी येथे माणसेवी डॉक्टर आणि आरोग्य सेविका राहतात. मात्र ते मुख्यालयी राहत नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे. एकूणच या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अतिदुर्गम भागातील आरोग्याच्या सोयी कधी चांगल्या होतील, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
चरवीदंड या तिच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे डॉ. राहुल कापगते आणि आरोग्य सेविकेची ड्युटी आहे. तर पाच किलोमीटर अंतरावर नवेझरी येथे माणसेवी डॉक्टर आणि आरोग्य सेविका राहतात. मात्र ते मुख्यालयी राहत नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे. एकूणच या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अतिदुर्गम भागातील आरोग्याच्या सोयी कधी चांगल्या होतील, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.