नेमकं काय घडलं?
बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी आहे. रेअर फार्मा कंपनीत केमिकल्स उत्पादन केलं जातं. सोमवारी (५ ऑगस्ट २०२४) पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास कंपनीत रिअॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी अचानक रिसिव्हरमध्ये एक मोठा स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला आणि कंपनीत भीषण आग लागली. काहीच वेळात ही आग वाढत गेली आणि रेअर फार्मा कंपनी आगीत भस्मसात झाली.
दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की रिअॅक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एका कुटुंबातील तिघेजण एक पुरुष, महिला आणि लहान मुलगी हे या घटनेत गंभीर जखमी झाले. यामध्ये महिलेचा एक पाय कायमचा निकामी झाला आहे. तर दुसऱ्या पायालाही दुखापत झाली आहे.
या तिघांपैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. दरम्यान, सदर स्फोट नेमका कसा झाला आणि त्याचं कारण काय याची माहिती पोलीस आणि अग्निशमन अधिकारी घेत आहेत.