शरद पवार यांचे नेतृत्व झुगारत जून २०२३मध्ये राष्ट्रवादीतील आमदारांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आणि आपलाच गट हा मूळ पक्ष असल्याचा दावा केला. या दाव्याला दुजोरा देत निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पक्षाचा चारपैकी केवळ एकच खासदार निवडून आला, तर पाठिंबा दिलेल्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला.
पहिल्यांदाच निवडून आलेल्यांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मकता
विधानसभा निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व २८८ जागांवर सर्वेक्षण करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. तसेच, पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवीन कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, तिनेच पक्षाला गुलाबी रूप दिले आहे. एकीकडे पक्षाच्या प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न होत असताना आमदारांच्या कामगिरीचा कानोसा घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. यात विद्यमान आमदारांतील पहिल्यांदाच निवडून आलेल्यांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मकता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. या आमदारांच्या कामगिरीवर नागरिक समाधानी असून, त्यांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
आरक्षण वादावर भूमिका, मांडणाऱ्यांबाबत सावधगिरी
सध्या राष्ट्रवादीकडे ४१ आमदार असून, त्यातील जवळपास २५ टक्के आमदार हे २०१९साली पहिल्यांदाच निवडून आले होते. अशा आमदारांना पुन्हा तिकीट मिळाले तर त्यांची निवडून येण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे. त्यामुळेच त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा तिकीट दिले जाण्याची दाट शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.