वाझेंचे तुरुंगातून फडणवीसांना पत्र
वाझेने हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० जुलै रोजी तुरुंगातून लिहिले होते. त्यातील तपशील उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी आरोपांचे खंडन केले आहे. तसेच ‘वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. न्यायालयांनीही पूर्वी तसे नमूद केले होते’, असा दावाही या नेत्यांनी केला आहे.
वाझेंच्या पत्रात काय?
वाझेने तुरुंगातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० जुलै रोजी पत्र लिहिले होते. या पत्रातील तपशील उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाझेंने पत्रात लिहिले… ‘देशमुखांच्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळातील कारभार खालच्या पातळीवर गेला होता. पवारसाहेब व पाटीलसाहेब यांच्या नावाने त्यांनी अनेकांवर दबाव आणला. त्यांच्या गटाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये जमवले. काही अधिकाऱ्यांची कामे झाली, मात्र काहींची नाही. गुन्हे गुप्तचर कक्षातील माझ्या कार्यकाळात देशातील बेकायदा हुक्का पार्लरच्या वितरकावर आम्ही छापा टाकला असताना त्याच्याविरोधात अटक कारवाई होण्याऐवजी जयंत पाटील यांनी मला अन्य व्यक्तीला अटक करण्याचा आदेश दिला. देशमुख यांचा निकटवर्तीय पालांडे हा वैध नियुक्तीविनाच एक वर्षाहून अधिक काळ त्या पदावर राहिला. चांदिवाल आयोगासमोर झालेल्या चौकशीत प्रश्नांना विशिष्ट उत्तरे देण्यासाठी माझ्यावर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व वकिलाने दबाव आणला…’, असे विविध दावे वाझेने पत्रात केले आहेत.