मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात सभा सुरू असताना, हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला. त्यावेळी जरांगे पाटील यांनी जातीसाठी भिजा, लोक निवडून येण्यासाठी भिजत असतात, असा खोचक टोला शरद पवारांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. नारायण राणे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली.
आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सोलापूर येथील शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी सर्वच पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. पालकमंत्री व राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना जरांगे यांनी आदिमानव असे संबोधले.
२९ तारखेला पुढची दिशा ठरवणार, अंतरवाली सराटीला येण्याचे आवाहन
आम्ही आमच्या जातीलाच बाप मानतो. तुम्ही तुमच्या नेत्याला बाप मानतात. हा तुमचा आणि आमच्या संस्कारातला फरक आहे. मराठा समाजातील आंदोलकांवर देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलत असल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातिवंत मराठा यापुढे घरात बसू शकत नाही. स्वतःच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने मराठा समाज उभे राहणार आहे. मराठा समाजातील कोणीच आता कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही, असे ते म्हणाले. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. अंतरवाली सराटी येथे निवडणुकीची दिशा ठरवली जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
नारायण राणेंवर जरांगे तुटून पडले
सोलापुरातील शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली. जरांगेना आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. कोकणातला एक नेता भिंतीकडे पाहून बोलत असल्याची टीका त्यांनी केली. मी मॅनेज होत नाही म्हणून विरोधकांकडून माझी बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ९६ कुळी मराठा समाजाला बोलणारा तू कोण? असा प्रति प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईवाल्याच्या दारात जाऊ नका
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाच्या विरोधात अभियान उघडले आहे. प्रवीण दरेकर हे मराठा समाजाच्या लेकरांचे वाटोळे करत आहेत. हे मराठा समाजाला कळले आहे. त्यामुळे कोणाच्याही दारात जाऊन जाब विचारण्याची गरज नाही, हे मी सर्व मराठा समाजाला सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे अभियान कोणीही चालवू नये. मुंबईत कोणाच्याही दारापुढे जाण्याची मराठा समाजाला आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.