नेमकं काय घडलं?
या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तू किसन दळवे (वय ६५, रा. कानडी बदन, ता. केज, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अशोक दत्तू दळवे याचा विवाह वर्ष २०११ मध्ये पूजा सोळुके हिच्याशी झाला होता. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर दोघे जण छत्रपती संभाजीनगरात राहण्यासाठी आले होते. यानंतर काही दिवसांनी पूजाचे बाहेर संबंध असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांना दिली. सदर प्रकरण हे दळवे कुटुंबीयांनी पूजा हिच्या आईवडिलांकडे सांगितले. घरातील मोठ्यांनी समझोता करून दिला. यानंतर पूजा पुन्हा नांदण्यास आली. वर्ष २०१३ आणि २०१६ मध्ये या दोघांना दोन मुलं झाली. यानंतरही २०२२ मध्ये पुन्हा अशोक याने पूजाबाबत तक्रार केली. पूजाचे संसाराकडे दुर्लक्ष होत आहे. ती संसारात लक्ष देत नाही, अशी तक्रार अशोकने पूजाच्या आईवडिलांकडे केली. या कारणावरून पूजासह तिचे आईवडील आणि भावाने अशोक दळवे याला शिवीगाळ करून मारहाण केली. पूजाच्या कुटुंबीयांनी अशोकला सांगितले, की आमच्या मुलीला न्यायचे असेल तर तुझ्या घरून पैसे घेऊन ये. जमीन माझ्या मुलीच्या नावावर करण्यासाठी सांग.’ या मागणीसाठी अशोकचा त्यांनी वारंवार छळ केला.
या प्रकरणात बीड येथून अशोकचे वडील दत्तू दळवे व त्यांची पत्नी हे छत्रपती संभाजीनगर शहरात सहा ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या दरम्यान अशोक याच्या घरी आले. घरी आल्यानंतर अशोकने घडलेल्या गोष्टींबाबत संताप व्यक्त केला. त्या वेळी अशोकने ‘मला जगाचा कंटाळा आला आहे. मला पूजा आणि तिच्या आईवडिलांनी, भावाने खूप त्रास दिला,’ असे सांगितले. यानंतर अशोक रात्री १२.३० वाजता झोपण्यासाठी गेले. यानंतर पहाटे चारच्या दरम्यान अशोकने सिलिंग फॅनच्या बाजूच्या हूकला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दत्तू दवळे यांच्या तक्रारीवरून पूजा अशोक दळवे, सासु सुरेखा हनुमंत साळुंके, सासरे हनुमंत साळुंके आणि अभिजीत साळुंके या चौघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘तुम्ही आल्याशिवाय येणार नाही’
अशोक दळवे व पूजा यांच्यात वाद झाला. या वादानंतर पाच ऑगस्ट २०२४ मध्ये रात्री आठच्या सुमारास पूजा हिने अशोक यांच्या आईवडिलांना फोन केला आणि ‘आमच्या दोघांचे भांडण झाले आहे. मी माहेरी मुलांना घेऊन आली आहे. जोपर्यंत तुम्ही शहरात येत नाही. तोपर्यंत मी नांदण्यास येणार नाही.’ असे सांगिलते. यामुळे अशोक याचे आई व वडील तातडीने निघून आले होते.