विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. प्रभारी रमेश चेन्नितला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमित देशमुख आदी नेते आज नांदेडमध्ये आले होते. रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत अमित देशमुख यांनी त्यांचे वडील विलासराव देशमुख यांच्या स्टाईलने फटकेबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवले आणि प्रतिस्पर्ध्यांना डिवचले.
सेम टू सेम आवाज, बोलण्यातला ठहराव, अन् मराठवाडी लहेजा…. अमित देशमुख यांचे भाषण गाजले
विलासराव देशमुख यांची भाषण करण्याची स्वत:ची शैली खास होती. बोलण्यातला ठहराव, चालण्या-बोलण्यातली लकब, भाषणादरम्यानचे हातवारे, मराठवाडी लहेजा यामुळे विलासरावांचं भाषण सगळ्यांपेक्षा उजवे ठरायचे. गंभीर विषयांवरही बोलत असताना हलकासा विनोद करुन, उपस्थित नेत्यांना कोपरखळ्या मारुन कितीही गंभीर वातावरण असलं तरी ते तणावमुक्त करायचे. अगदी तसेच भाषण त्यांचे सुपुत्र अमित देशमुख करतात. त्याचीच झलक आज नांदेडमध्ये दिसली.
अशोकाची पतझड पण वसंत फुलला
नांदेड हा काँग्रेस पक्षाचा गड आहे, हे लोकसभा निवडणुकीत नांदे़च्या सामान्य जनतेने दाखवून दिले आहे. लातूरपेक्षाही नांदेडला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी जास्त आहे. कारण काँग्रेस पक्ष वाढावा, अशी लोकांचीच इच्छा आहे. त्या पक्षाला जोपासण्याचे काम लोकांनीच केले. काँग्रेस पक्षाची नाळ सामान्य लोकांशी जुळलेली आहे, हेच लोकांनी मतदानाच्या माध्यमातून अधोरेखित केल्याचे अमित देशमुख म्हणाले. तसेच अशोकाची पतझड झाली पण नांदेडमध्ये वसंत फुलला म्हणत त्यांनी अशोक चव्हाण यांना कोपरखळीही लगावली.
शीर्षस्थ नेत्यांवर विश्वास ठेवला, नांदेडकरांनो आभार मानतो
यावेळी अमित देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. अशोकाची पतझड झाली पण वसंत ऋतू फुलला आहे. नांदेड हाच काँग्रेसचा गड आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत सामान्य नागरिकांनी सिद्ध केले. नांदेडच्या लोकांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.