‘कले’ला उतरती कळा; पाच वर्षांत मुंबईत १० टक्केच विद्यार्थ्यांचा अकरावीत आर्ट्सला प्रवेश

रोहन टिल्लू, मुंबई : एकेकाळी प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कला शाखेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. अकरावी प्रवेशाच्या गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबई विभागातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जेमतेम १० टक्के विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमासाठी आर्ट्सची निवड करीत असल्याचे दिसते. सहज नोकऱ्या मिळवून देणारी आणि ‘प्रतिष्ठे’ची म्हणून कॉमर्स शाखेला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत सायन्सखालोखाल आर्ट्स शाखेला मान होता. सायन्सला प्रवेश न मिळणारे विद्यार्थी हमखास आर्ट्सला प्रवेश घेत पुढील वाटचाल करायचे. मात्र, बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विश्वात आर्ट्सचेच नव्हे, तर सायन्सचेही स्थान कॉमर्सने पटकावल्याचे चित्र आहे.

गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास एकूण विद्यार्थ्यांमध्ये आर्ट्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९.६० ते ९.९७ टक्के एवढीच आहे. कॉमर्सला प्रवेश घेणाऱ्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसत असली, तरी एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५३ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कॉमर्सला पसंती दिली आहे. सायन्स शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत वाढले असून, सध्या ते ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

यंदा अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या दोन लाख २० हजार ७२२ विद्यार्थ्यांपैकी फक्त २१ हजार ७६३ म्हणजेच ९.८५ टक्के विद्यार्थ्यांनी आर्ट्सची निवड केली, तर एक लाख १३ हजार ९१५ म्हणजेच तब्बल ५१.६१ टक्के विद्यार्थ्यांचा कल कॉमर्सकडे आहे.

अभ्यासापेक्षाही पैसे मिळवून देण्याचे साधन म्हणून पदवीकडे बघितले जाते. हा दृष्टिकोन आधीही होता. पण, आता तो वाढला आहे. आर्ट्सला जाणे म्हणजे कमी प्रतिष्ठेचे, असाही गैरसमज आहे. आर्ट्सच्या विषयांना इतर कौशल्यांची जोड दिली, तर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.– डॉ. स्नेहा देऊसकर, उप-प्राचार्य, झुनझुनवाला महाविद्यालय

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने अर्थविषयक अनेक घडामोडी येथे होतात. आर्थिक विषयातील अनेक संधी आहेत. कॉमर्सचा अभ्यास करता-करता सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, रिस्क मॅनेजमेंट अशा परीक्षांचे अभ्यास करता येतात. कॉमर्स शाखेत मुंबई विद्यापीठात १० ते १२ विविध अभ्यासक्रम असल्याने व्यवसायाभिमुख किंवा नोकरीभिमुखतेमुळे विद्यार्थ्यांचा ओढा कॉमर्सकडे वाढत आहे.– डॉ. कविता लघाटे, अधिष्ठाता, मुंबई विद्यापीठ कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभाग
Maharashtra CET 2024: बीएमएस/बीबीएम/बीसीए/बीबीए यांचे प्रवेश कधी सुरु होणार? दुसऱ्या सीईटीच्या निकालाची तारीख जाहीर; वाचा सविस्तर
‘एनईपी’ने बदलणार चित्र

नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर आता आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या शाखांमधील भेद हळूहळू लोप पावणार आहे. बहुशाखीय दृष्टिकोन, हा या शिक्षण धोरणाचा पाया आहे. त्यामुळे एका शाखेतील विद्यार्थी दुसऱ्या शाखेतील विषयाचे शिक्षण घेऊ शकणार आहे. येत्या काळात या शाखांमधील भेद आणि पालकांचे या शाखांबद्दलचे गैरसमज कमी होतील, असा विश्वास मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाच्या अधिष्ठाता डॉ. कविता लघाटे आणि झुनझुनवाला महाविद्यालयाच्या उप-प्राचार्य डॉ. स्नेहा देऊसकर यांनी व्यक्त केला.

गेल्या सहा वर्षांतील आकडेवारी

शाखा २०१८-१९ २०१९-२० २०२०-२१ २०२१-२२ २०२३-२४ २०२४-२५*
आर्ट्स २२,२५१ २१,६२७ २२,११४ २२,९६८ २६,७१६ २१,७६३
कॉमर्स १,४२,३१७ १,३४,७३७ १,३०,२९८ १,३३,३६८ १,४२,०७२ १,१३,९१५
सायन्स ६३,२८१ ५९,११० ६८,१६७ ७४,९३२ ९६,३६१ ८३,१४४
एचएसव्हीसी ३८८१ ३२५६ ३०७२ ३१५१ २७११ १९००
(*२०२४-२५ची आकडेवारी ११ ऑगस्टपर्यंतची आहे. २०२२-२३ची आकडेवारी उपलब्ध नाही)

Source link

11th admission 202411th Admission artsarts facultyCollege studentseducational newsकविता लघाटेमुंबई बातम्यामुंबई विद्यापीठ कॉमर्स आणि मॅनेजमेंट
Comments (0)
Add Comment