संजय राऊत काय म्हणाले?
मातोश्रीच्या बाहेर हंगामा करण्यासाठी १०-१२ जण आले होते. त्यापैकी अर्धे गुन्हेगार होते, ते कोणी पाठवले, ती सुपारी कोणी दिली होती, तर ती सगळी मुख्यमंत्र्यांची माणसं होती. हे सगळे वर्षावर असतात किंवा ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी राहतात, किंवा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असतात. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे राहिलेले त्यांचे फोटो आहे. एकाचं नाव अकबर सय्यद, दुसरा सलमान शेख, अफरार सिद्दीकी, यापैकी इस्तियाक सिद्दीकी तर मिसेस मुख्यमंत्र्यांसोबत होता. इलियास शेख सगळ्यात जास्त उडत होता. अक्रम शेखही आहे. हे सगळे सुपारी गँगचे सदस्य आहेत. त्यांचे सरदार दिल्लीत बसतात. अहमद शाह अब्दाली यांच्या पेरोलवर आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दोन महिन्यांनी सत्ता आमच्या हातात, तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपाल ते पाहू. अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतो, हे पानिपतावर झालं, त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडत आहेत. एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की बीडमधील घटनेशी शिवसेनेचा (आमचा) संबंध नाही, आम्हाला कसली आव्हानं देता? आम्ही अधिकृतपणे सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला आव्हानं देताय. कोण देतंय ज्यांनी शिवसेना पक्ष चोरला, असंही राऊत म्हणाले.
आम्हाला मराठी माणसात भांडणं लावायची नाहीत, आणि कोणी लावत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. तुम्ही आम्हाला धमक्या देताय, मग महाराष्ट्र लुटणाऱ्या, मराठी अस्मिता पायदळी तुडवणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हानं देण्याची भाषा करा, हिंमत असेल तर. घोडा मैदान लांब नाही, असं राऊत म्हणाले.