साहित्यप्रेमींसाठी Good News! आता अध्यक्षीय भाषणे एका क्लिकवर; साहित्य संमेलनातील भाषणे डिजिटाइज करणार

मुंबई : नवी दिल्ली येथे होणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झालेली असताना १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाच्या आठवणींचीही चर्चा होत आहे. १९५४ मधील संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यांच्या भाषणामध्ये मराठीचा देशातील महत्त्वाची भाषा म्हणून उल्लेख झालेला असताना आज या भाषणाचा संदर्भ सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे मराठी साहित्य रसिकांकडून जुनी अध्यक्षीय भाषणे तसेच महत्त्वाच्या उद्घाटकांची भाषणे सहज उपलब्ध होण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १००व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनचाच्या निमित्ताने जुन्या अध्यक्षीय भाषणांचे डिजिटायजेशन होऊ शकेल, असे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांकडे त्या वर्षीच्या स्मरणिकांमध्ये अध्यक्षीय भाषणे तसेच उद्घाटकांची भाषणे असतात. मात्र, आजच्या डिजिटल युगातही ही भाषणे सहज उपलब्ध होत नसल्याची वाचकांची तक्रार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चारही घटकसंस्थांपैकी एकाही घटकसंस्थेकडे सर्व स्मरणिका उपलब्ध नाहीत, अशी तक्रार बदलापूरच्या ग्रंथसखाचे श्याम जोशी यांनी केली. त्यांच्याकडे आठ ते दहा स्मरणिका उपलब्ध आहेत. स्थानिक पातळीवर संमेलनासाठी या स्मरणिका छापल्या की नंतर बाहेरगावच्या वाचकांना या स्मरणिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणांची पुस्तके निघाली आहेत मात्र स्वागताध्यक्ष, उद्घाटक यांच्या भाषणांचीही पुस्तके निघायला हवीत असे ते म्हणाले.

तंत्रज्ञानाचा वापर करून ही अध्यक्षीय भाषणे १००व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यप्रेमींसाठी डिजिटाइज पद्धतीने उपलब्ध करून देता येतील असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कार्यवाह डॉ. उज्जवला मेहेंदळे यांनी सांगितले. यासाठी महामंडळामध्ये चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल. घटकसंस्थांच्या संकेतस्थळापेक्षा महामंडळाचे संकेतस्थळ तयार करून त्यावर ही माहिती नोंदवली जाणे अपेक्षित आहे. मराठी वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या साहित्य संमेलनांची अद्ययावत माहिती मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध नाही. मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर २०१६ पर्यंतचीच संमेलन स्थळे आणि अध्यक्षांची माहिती उपलब्ध होते. त्याच्या नंतरची माहिती उपलब्ध होत नाही. यासाठी महामंडळाकडून पुढाकाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Nagpur Drug Case: नागपुरात ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५२ किलो एमडीसह ७८ कोटी रुपयांचे साहित्य जप्त
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुढाकार

दिल्ली येथील संमेलनानंतर महामंडळाचा कारभार पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे जाईल. त्यानंतर १००व्या संमेलनासाठी महामंडळ पुण्यातच असेल. त्यामुळे अध्यक्षीय भाषणे डिजिटाइज पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुढाकार घेईल असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. ८०च्या दशकांपर्यंतची अध्यक्षीय भाषणे भीमराव कुलकर्णी यांनी संपादित करून त्याचे दोन खंड तयार केले होते. त्यानंतर पुढच्या खंडावर सध्या काम सुरू असून डॉ. नीलिमा गुंडी २०२३ पर्यंतच्या अध्यक्षीय भाषणांचा खंड तयार करत आहेत. हा खंड लवकरच उपलब्ध होईल असे प्रा. जोशी यांनी सांगितले. मात्र येत्या कालावधीत ही अध्यक्षीय भाषणे तसेच महत्त्वाची उद्घाटकांची भाषणे संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

Source link

Maharashtra Sahitya Parishadmarathi sahitya mahamandalMarathi Sahitya Sammelanअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमराठी भाषामुंबई बातम्यासाहित्य संमेलनसाहित्यप्रेमी
Comments (0)
Add Comment