तंत्रज्ञानाचा वापर करून ही अध्यक्षीय भाषणे १००व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यप्रेमींसाठी डिजिटाइज पद्धतीने उपलब्ध करून देता येतील असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कार्यवाह डॉ. उज्जवला मेहेंदळे यांनी सांगितले. यासाठी महामंडळामध्ये चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल. घटकसंस्थांच्या संकेतस्थळापेक्षा महामंडळाचे संकेतस्थळ तयार करून त्यावर ही माहिती नोंदवली जाणे अपेक्षित आहे. मराठी वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या साहित्य संमेलनांची अद्ययावत माहिती मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध नाही. मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर २०१६ पर्यंतचीच संमेलन स्थळे आणि अध्यक्षांची माहिती उपलब्ध होते. त्याच्या नंतरची माहिती उपलब्ध होत नाही. यासाठी महामंडळाकडून पुढाकाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुढाकार
दिल्ली येथील संमेलनानंतर महामंडळाचा कारभार पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे जाईल. त्यानंतर १००व्या संमेलनासाठी महामंडळ पुण्यातच असेल. त्यामुळे अध्यक्षीय भाषणे डिजिटाइज पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुढाकार घेईल असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. ८०च्या दशकांपर्यंतची अध्यक्षीय भाषणे भीमराव कुलकर्णी यांनी संपादित करून त्याचे दोन खंड तयार केले होते. त्यानंतर पुढच्या खंडावर सध्या काम सुरू असून डॉ. नीलिमा गुंडी २०२३ पर्यंतच्या अध्यक्षीय भाषणांचा खंड तयार करत आहेत. हा खंड लवकरच उपलब्ध होईल असे प्रा. जोशी यांनी सांगितले. मात्र येत्या कालावधीत ही अध्यक्षीय भाषणे तसेच महत्त्वाची उद्घाटकांची भाषणे संकेतस्थळावर वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.