नितेश राणे काय म्हणाले?
“इकडच्या पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांना सांगेन, की सरकार हिंदुत्वाचं आहे. गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तुम्हाला जर पोस्टिंगवरुन मजा येत नसेल ना आणि अशी सगळी मस्ती जर कराल, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ की बायकोला फोनही लागणार नाही” असा दम नितेश राणे यांनी भरला.
…तर पोलिस स्टेशनला धिंगाणा घालू
“आमच्या हिंदुत्वाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही, लक्षात ठेवा. कुठल्याही माझ्या भगिनीची केस तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आली, आणि पुढच्या अर्ध्या तासात जर ती केस दाखल झाली नाही ना, तर त्या पुढच्या तीन तासात मी तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन धिंगाणा घालेन लक्षात ठेवा” असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिला. “मी नुसतं तोंडावर बोलत नाही, मी कुणाला धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारलं जातंय” असंही ते म्हणाले.
पलूस शहरात लव्ह जिहादच्या विरोधात भाजप खासदार अमर साबळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना नितेश राणेंनी पोलिसांना तंबी दिली. उरण आणि धारावी हत्या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा, दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी सांगलीत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
वादांची परंपरा
नितेश राणेंनी पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पोलिस काय करणार आहेत? हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरी जाऊन बायकोला दाखवतील, असंही नितेश राणे याआधी म्हणाले होते. तर आमचा बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसतो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केल्यानंतरही नितेश राणे चर्चेत आले होते.