स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतल्यावर सूर्यकांता पाटील चांगल्याच ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सूर्यकांता पाटील हजर होत्या. स्वगृही परतलेल्या नेत्यांचा यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार करण्यात आला. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाला माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आमदार प्रदीप नाईक, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भगवान आलेगावकर शहराध्यक्ष डॉ सुनील कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
स्वगृही परतल्यानंतर स्वातंत्र्य साजरे करतेय
दहा वर्ष मी गप्प होते, माईक देखील हातात घेतला नाही. आता सर्व माईक माझ्याकडे आले आहे. स्वगृही परतल्यानंतर स्वातंत्र्य साजरे करत आहे, असे सूर्यकांता पाटील म्हणाल्या. आपण हदगाव विधानसभेसाठी इच्छुक आहात काय? असे विचारल्यावर मी कुठूनही इच्छुक नाही पण साहेबांनी सांगितले तर मी पाकिस्तानमध्येही जाऊन लढेन, असे सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
जिल्ह्यातील चार जागांची मागणी करणार
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे. जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी पक्षाकडून जागांवर दावा सांगणे सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ मतदार संघ आहेत. त्यातील चार जागांची आम्ही मागणी करणार आहोत. तो आमचा अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांवर टीका
साखर कारखान्यांच्या मुद्द्यावर बोलताना सूर्यकांता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या साखर कारखान्याला बँकेने कर्ज दिले होते. पण अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी कारखाना विकला, वन टाइम सेटलमेंट करून घ्यायला पाहिजे होतं, पण वेळेवर घेतले नाही. आज माझ्याकडे कारखाना नाही आणि जमीन पण नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.