२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरुन भाजपची साथ सोडली. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानं ठाकरे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते पुन्हा मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत. आपला मानस त्यांनी गेल्याच आठवड्यात केलेल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या नेत्यांकडे व्यक्त केला. पण काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलेला नाही. याबद्दलचा निर्णय निकालानंतर घेतला जाईल, असं काँग्रेस नेतृत्त्वाकडून ठाकरेंना सांगण्यात आलं.
आता काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. विधानसभेच्या प्रचारात महाविकास आघाडीचं नेतृत्त्व करा, असं काँग्रेसकडून ठाकरेंना सांगण्यात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींना राज्यातील काँग्रेस नेत्यांना याबद्दलची माहिती कळवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसनं महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. उद्या महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा होत आहे. त्यात ठाकरेंच्या प्रचारप्रमुखाबद्दलची घोषणा केली जाऊ शकते.
लोकसभेला उद्धव ठाकरेंनी राज्यभर फिरुन सभा घेतल्या. त्यांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढवल्या. २०१९ मध्ये काँग्रेसला राज्यात लोकसभेची केवळ एक जागा आली होती. त्यामुळे लोकसभेला काँग्रेसनं ठाकरेंसमोर काहीशी नमती भूमिका घेतली. काँग्रेसनं ठाकरेंना २१ जागा सोडल्या. तर स्वत: १७ जागा लढवल्या. पैकी १३ जागांवर पक्षाला यश मिळालं. पण ठाकरेंचे २१ पैकी ९ उमेदवारच विजयी झाले. त्यानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत विधानसभेला आपण मोठा भाऊ असू अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली.