केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन्ही राज्यांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०१९मध्ये हरयाणा, झारखंडसह महाराष्ट्राच्याही निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार का, अशी उत्सुकता सर्वांना होती. मात्र, निवडणूक आयोगाने दोनच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्र विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. म्हणजे नोव्हेंबरअखेरीस राज्यात नव्या सरकारची स्थापना होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, महाराष्ट्राच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शरद पवार यांनी शनिवारी नागपुरात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘लाडक्या खुर्चीसाठी लाडकी बहीण’
‘शरद पवार यांनी आणलेल्या महिला धोरणामुळे महिला सक्षम झाल्या. महिलांना सैन्य दलात प्रवेश, घरेलू कामगार कायदा, असे महत्त्वपूर्ण कायदे पवार यांच्या कार्यकाळात घेण्यात आले’, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. मात्र, आता चित्र नकारात्मक निर्माण होत आहे. धान्याची निर्यात करणाऱ्या देशात आता आयात करावी लागत आहे, अशी टीकाही देशमुख यांनी केली. निवडणूक तोंडावर असल्याने लाडक्या खुर्चीसाठी लाडकी बहीण योजना आणली असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.
गृहखात्यावर बोलता येईल, पण सध्या नाही!
नागपूर : बांग्लादेशमध्ये घडलेल्या घटनांवरून आपल्या देशातील सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात टाकण्याची गरज नव्हती. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडले, त्यावरून शासनाची कार्यवाही आणि गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. मात्र, आज शांतता राखणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे जे कोणी यात सहभागी आहेत, त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले. सार्थक फाउंडेशनच्या वतीने वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी हे वक्तव्य केले. नाशिकध्ये दोन जमाव एकमेकांसमोर आल्याने ही दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वाद निर्माण झाला. समाजाच्या सर्व घटकांमध्ये आज एकवाक्यता निर्माण व्हायला हवी. महाराष्ट्रात जे घडत आहे, ते समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. संयमाचा पुरस्कार करायला हवा. शांतता टाकून राहील याबाबतची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे पवार म्हणाले.