मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीचा गेल्या मंगळवारी (दि. १३) नाशिक येथे समारोप झाला. यावेळी जरांगे यांनी आगामी विधानसभा लढविण्याबाबत २९ ऑगस्ट रोजी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी १४ ते २० ऑगस्टदरम्यान इच्छुकांनी आपल्या कामांचा अहवाल आंतरवाली सराटी येथे पाठवावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्ह्यातून इच्छुक मराठा तसेच राखीव मतदार संघातून मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्यांकडून अहवाल पाठविण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमधील इच्छुकांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना अहवाल सादर केला आहे. जवळपास १५ जागांसाठी दीडशे इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यावेळी अंतरवाली सराठी या ठिकाणी भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात करण गायकर, विलास पांगारकर, नानासाहेब बच्छाव, आशिष हिरे, सुभाष गायकर, वैभव दळवी, राम निकम, संदीप खुटे, ज्ञानेश्वर सुरवसे, राम खुर्दळ, काका पवार, अण्णासाहेब खाडे, संदीप हांडगे, योगेश नाटकर, हर्षल खैरनार, श्रेयस बच्छाव, चंद्रकांत बच्छाव, बाळासाहेब बच्छाव, भास्कर झाल्टे, भीमराज लोखंडे, विशाल वडघुले आदी समाजबांधव उपस्थित होते. २९ ऑगस्टला नाशिकमधून प्रत्येक गावातून किमान एक गाडी आंतरवाली सराटी येथे जाणार आहे. त्यासंदर्भात नाशिक जिल्ह्याची अंतिम तयारी सुरू आहे.
…यांच्याकडून अर्ज सादर
आतापर्यंत प्रत्येक मतदारसंघातून किमान दहा अहवाल पाठविण्यात आले आहेत. २०ऑगस्टपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढलेले करण गायकर यांचाही समावेश असून, त्यांनी नाशिक पश्चिमसह येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याव्यतिरिक्त नाशिकच्या शिवतीर्थ येथे शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ साखळी उपोषण करणारे नाना बच्छाव यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.