बांग्लादेशमध्ये हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पुकारला जाणार असल्याची माहिती देण्यासाठी संभाजी भिडे यांनी सहकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बांग्लादेश अत्याचार, कोलकाता बलात्कार प्रकरण, मराठा आरक्षण आंदोलन आदी मुद्द्यांवर मते मांडली.
मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठे म्हणजे वाघ-सिंह
मराठा आरक्षण हा सध्याच्या घडीचा कळीचा मुद्दा आहे. पण मराठा म्हणजे वाघ-सिंह आहेत. संपूर्ण जंगल तुमचे आहे. असे असताना मराठ्यांनी आरक्षण का मागावे? सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख करत या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तरी वाघ-सिंहांनी तिथे प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये माश्याने प्रवेश घ्यावा का? याच न्यायाने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असे संभाजी भिडे म्हणाले.
देशाचा संसार चालविणारी मराठ्यांची जात आहे
मराठ्यांनी उभा देश चालवायचा. आरक्षण कसले मागता? आरक्षणाची काय गरज? सबंध देशाचा संसार चालविणारी मराठ्यांची जात आहे, हे त्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्या दिवशी मातृभूमीचे भाग्य उजळून निघेल, असेही संभाजी भिडे म्हणाले.
सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारला जाईल
बांग्लादेशात होत असलेल्या हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी भारत सरकारने त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी करताना त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पुकारला जाईल, अशी माहिती भिडे यांनी दिली. तसेच याप्रकरणी उद्धव ठाकरे काहीही बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.