महायुतीमध्ये अजित पवार गट आणि हसन मुश्रीफ सामील झाल्यापासून मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते समरजीत घाटगे अस्वस्थ होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील नाराजी दर्शवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थांबत कागलमधून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र सध्या महायुती मध्ये विद्यमान आमदारालाच पुन्हा उमेदवारी असा फॉर्मुला असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल मध्ये कार्यक्रमात हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. यामुळे समरजीत घाटगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात समरजीतराजे तुतारी फुंकणार
अशातच गेल्या काही दिवसांपासून समरजीत सिंह घाटगे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी ऑफर देण्यात येत असल्याच्या चर्चाही सुरू होती.अशातच अजित पवार यांनी थेट हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने समरजीत घाटगे यांना तुतारी हातात घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. कारण कागलच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली की याचा फायदा हसन मुश्रीफ यांना दरवेळेस होतो. यामुळे समरजीतराजे आता तुतारी हातात घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यासंदर्भात समरजीत घाटगे मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती असून शरद पवार ३ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर यावेळी कागलच्या गैबी चौकात सभा घेत समरजीतराजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र याआधी येत्या २ दिवसात २३ ऑगस्ट रोजी समरजीत घाटगे कागल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार असून कार्यकर्त्यांची मत देखील ते जाणून घेणार आहेत. यानंतर ते यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट सामना रंगणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत काय झाले होते?
मात्र शरद पवारांच्या या खेळीमुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मोठा फटका बसणार आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत हसन मुश्रीफ यांना १ लाख १६ हजार ४३४ तर अपक्ष उमेदवार समरजीत घाटगे यांना ८८ हजार ३०२ तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय बाबा घाटगे यांना ५५ हजार ६५७ मते मिळाले होते. सध्या संजय बाबा घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
कार्यकर्त्यांचा मेळाला बोलविला
दरम्यान, शरद पवार गटात जाण्याच्या निर्णयावर अद्याप समरजीत घाटगे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून केवळ २३ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार असल्याचे समरजीत घाटगे म्हणाले आहेत.