अक्षयच्या घराची नागरिकांकडून तोडफोड
संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे. बदलापूर मधील खरवई गावातील एका चाळीत अक्षय शिंदे राहत होता. त्याचबरोबर त्याचे नातेवाईक देखील त्याच्या शेजारी राहत होते. तोडफोडीनंतर अक्षय याचे कुटुंबीय गायब झाले आहे. यावेळी अधिकची माहिती विचारण्यात आली तेव्हा त्याचे 3 लग्न झाले असून एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही अशी माहिती मिळाली आहे.
खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची शनिवारी उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार घेण्यास पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. तसेच पीडितांवर लगोलग उपचार करण्यासही डॉक्टरांनी टाळाटाळ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घृणास्पद घटनेच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित
बदलापूरमध्ये झालेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलं होते. आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी राज्य सरकारकडे केली होती.