ठाणे (बदलापूर) : ठाण्यातल्या बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचारानंतर जनतेचा संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. यानंतर आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करत आंदोलन केलं. आता या आंदोलन प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक असा खुलासा झाला आहे. आंदोलनाच्याआधी, आंदोलनावेळी आणि नंतरचे काही फोन्स कॉल्स रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत. बदलापुरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आता या आंदोलनाच्या तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत. अनेक आंदोलक बाहेरचे होते, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.आंदोलनासाठी करण्यात आलेले काही फोन आणि व्हाईस रेकॅार्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे आंदोलन पूर्व नियोजीत असल्याचेही पोलीस तपासात समोर आलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी ६८ जणांना अटक केली आहे. यात कल्याण रेल्वे पोलिसांनी २८ जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी ४० जणांना अटक केलीय. ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. रेलरोको, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पुर्वनियोजीत गुन्हेगारी कट रचणे, असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
CM Eknath Shinde: लहान बाळावरुन राजकरण करता, लाज वाटू द्या, बदलापुरातील आंदोलनावरुन मुख्यमंत्री भडकले
बदलापूरमधील आंदोलनावरून राजकारण तापलं
बदलापूरमधील आंदोलनावरून आता राजकारणसुद्धा तापलं आहे. बदलापुरात घडलेल्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ काम मोठं आंदोलन झालं. मात्र, हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गाड्या भरुन आंदोलनकर्ते आले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं दिसत आहे. एका लहान बाळासोबत जे घडलं त्यावरुन तुम्ही राजकारण करता, लाज वाटू द्या, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही ते म्हणाले.
घडलेली घटना दुर्दैवी आहे, एका लहान बाळाबाबत जे घडलं ते दुर्दैवी आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे आदेश कालच आयुक्तांना दिले होते. त्यावर कारावाई देखील सुरु झाली आहे. त्याच्यावर कठोरातील कठोर कलमं लावण्यात आली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचे आरोप होते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.