माझ्या मुलाला या प्रकरणात फसवलं जात असल्याचा दावा अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. दोन लहान चिमुकलींसोबत अक्षय शिंदेने जे काही केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तसला कुठला प्रकार घडलाच नाही, असा दावा अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवलं जात आहे, असं ते म्हणाले. अक्षयचं काम बाथरुमच्या सफाइचं आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार, असा सवाल त्यांनी केला. तसेच, अक्षयची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करा, अशी मागणी त्यांनी केली.
आमच्या घरातील सर्वांना मारहाण करण्यात आली. जेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा अक्षयने काहीतरी केल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.
बदलापुरात संतापजनक घटना
बदलपुरातील शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतच अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेनंतर जेव्हा या मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली, तेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी १० तास घेतले. तेवढ्या वेळ या पालकांना ताटकळत बसावं लागलं. यानंतरही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पालकांचा संताप वाढला. त्यानंतर २० ऑगस्टला पालकांनी थेट शाळेवर मोर्चा नेला. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी तब्बल १०-१२ तास रेल्वे रुळावर आंदोलनकर्ते होते. अखेर मधला मार्ग न निघाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजुला केलं.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. त्यानंतर २१ ऑगस्टला अक्षय शिंदेला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अक्षयच्या घराची तोडफोड
अक्षय शिंदे हा बदलापूरच्या खरवई गावातील आहे. संतप्त गावकऱ्यांनी त्याच्या घरात घुसून तोडफोड केली. तसेच, त्याच्या नातेवाईकाच्या घरीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे अक्षयच्या कुटुंबावर घर सोडून पळून जायची वेळ आली आहे. अक्षयचे तीन लग्न झाले असून त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याची माहिती आहे.