महायुतीमध्ये असलेले हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभेचे तिकीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यामुळे समरजीतसिंह घाटगे दुखावलेले होते. पुढचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करू असे त्यांनी सांगितले. मागील १५ दिवसांपासून आगामी राजकीय समीकरणांबाबत ते चाचपणी करत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी आगामी राजकारणाविषयी चर्चा केली. चर्चेअंती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. थोड्याच वेळात जयंत पाटील हे त्यांच्या मेळाव्याच्या ठिकाणी येणार आहेत.
भाजपमध्ये २०१६ साली प्रवेश करून कागलच्या विकासासाठी काम केले. संजय मंडलिक यांचा मला उलटा प्रचार करायचा नव्हता. सात जूनपर्यंत मी माझे कर्तव्य पार पाडले. ८ जून नंतर मी स्वराज्यासाठी काम सुरू केलं. माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक राहिलो. आता मला पुन्हा कागलमध्ये स्वराज्य निर्माण करायचं आहे. पक्ष सोडतोय हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांना मी सांगून आलो. कारण ते धाडस माझ्यामध्ये आहे. गडकरी, बावनकुळे चंद्रकांत पाटील आणि ज्योतीरादित्य सिंधिया यांनाही मी भेटून आलो, असे समरजीतसिंह घाटगे घाडगे यांनी सांगितले.
अपक्ष लढायचं की तुतारी हाती घ्यायची घाटगे यांनी कार्यकर्त्यांना विचारलं!
विधानसभा निवडणूक २०१९ ला आईसाहेबांनी सांगितलं म्हणून मी निवडणूक लढवली. आता मी तुम्हाला विचारतोय २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना आपण अपक्ष म्हणून जनतेसमोर जायचं की तुतारी फुंकायची असे समरजीतसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांना विचारले. त्यावर कार्यकर्त्यांनी एका सुरात तुतारी हाती घेऊन शरद पवारांना साथ द्यायची असे सांगितले.