Sharad Pawar On Maharashtra Bandh : बदलापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.
शरद पवार यांनी २४ ऑगस्ट रोजी होणारा राज्यव्यापी बंद मागे घ्यावा असं म्हटलं असून संविधानाचा आदर राखत हे आवाहन करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
‘बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.’
Maharashtra Bandh : ठाकरेंकडून महाराष्ट्र बंदची घोषणा, पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर बंद मागे घेण्याचं आवाहन केलं
दरम्यान, दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चे काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. महाविकास आघाडीने दिलेली बंदची हाक ही महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.