प्रवेशबंदीचा प्रस्ताव
शहर आणि शहराभोवतीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना गर्दीच्या वेळी कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर प्रवेश बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास त्यातून तात्पुरता दिलासा जरूर मिळणार आहे; पण एकूणच वाहनांची वाढणारी संख्या पाहता अधिक दूरगामी निर्णयाची अपेक्षा आहे.
नियोजन कागदावरच
पुण्यातून जाणारी वाहतूक थेट बाहेरच्या बाहेर वळविण्यासाठी वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याचे नियोजन अनेक वर्षे कागदावर आहे. त्यासाठी आराखडा, भूसंपादन आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, त्याबाबत अजूनही अंतिम निर्णय झाला नसल्याने या रिंग रोडचे काम सुरूच होऊ शकलेले नाही.
महत्त्वाचा प्रकल्प
मुंबईहून येणारी आणि साताऱ्याच्या दिशेने जाणारी अनेक वाहने सध्या या बाह्यवळण मार्गावरून जातात. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून थेट पुणे-सातारा रस्त्याला जोडणाऱ्या रिंग रोडमुळे ही सर्व वाहतूक परस्पर बाहेरच्या बाहेर सातारा, कोल्हापूर व दक्षिणेकडे जाऊ शकणार आहे. तसेच, पुणे-नाशिक, पुणे-छत्रपती संभाजीनगर या महामार्गांवरील वाहतूक कोंडी रिंग रोडमुळे काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री, निर्णय घ्या..
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होईल, याकडे बारकाईने लक्ष देतात. महाविकास आणि महायुती या दोन्ही सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत जवळपास साडेतीन वर्षे पुण्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच आहे. या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. आता अखेरच्या टप्प्यात या रिंग रोडचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, यासाठी त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान योजनेतून ते राज्यात ठिकठिकाणी दौरे काढत आहेत. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या बहिणींना दिलासा देण्यासाठी आणि कोंडीमुक्त रस्त्यांद्वारे नागरिकांचा सन्मान करण्यासाठी आता या रखडलेल्या रिंग रोडला त्यांनी गती देण्याची अपेक्षा आहे.