मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये शनिवारी सकाळपासून संततधार व अधूनमधून पावसाचा वाढलेला जोर दिसून आला. पावसाच्या आकड्यांनुसार, हवामान खात्याच्या सांताक्रुझ केंद्रावर सायंकाळी साडेपाचपर्यंत दिवसभरात ४६.९ व कुलाबा येथे १६.८ मिमी पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे ११०.७०, तर ठाण्यात ४८ मिमी पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे २९ मिमी पावसाची नोंद झाली. महामुंबईतील २५ हून अधिक पर्जन्यमापक केंद्रांवर शनिवारी १२ तासांत ४० ते ७० मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर व दक्षिण कोकणात गोव्यासह सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान ‘वाइडस्प्रेड’ म्हणजेच ७६ ते १०० टक्के भागात पावसाची शक्यता असेल. उत्तर कोकणात ताशी ६५ किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात नद्यांना पूर
मराठवाड्यात चार दिवसांपासून संततधार सुरू असून, विभागात गेल्या चोवीस तासांत ३४.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात दक्षतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्षतेचे आदेश दिले आहेत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये शनिवारी संततधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाच्या लहान-मोठ्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नोकरदारांसह ‘वीकेंड’ला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ झाली. रविवारीही शहरात मध्यम ते जोरदार आणि घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
जळगावात दमदार पुनरागमन
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जोर पकडला. रात्रभरापासून शनिवारी दुपारपर्यंत जळगाव जिल्ह्यात २२. ७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुपारपासून सायंकाळपर्यंतदेखील पावसाचा जोर कायम होता. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून दमदार पावसाने कमबॅक केले आहे. भडगाव तालुक्यात सर्वाधिक ३८.५, तर त्यापाठोपाठ एरंडोल ३६.१ तर अमळनेर तालुक्यात ३३. १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पारोळा तालुक्याची तहान भागवणाऱ्या तामसवाडी येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बोरी नदीला पूर आला आहे.