परिसरात मक्यासह कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. पेरण्यांनंतर पडत असलेल्या रिमझिम पावसावर पिके आजतागायत तग धरून होती. मध्यंतरी काही काळ पावसाने ओढ दिल्याने पाण्यावर आलेली पिके सुकत होती. यंदाच्याही पावसाळ्यात सुरुवातीचे अडीच महिने पाऊस जेमतेम होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून, मागील आठवड्यात ढगफुटीसदृश पावसाने तर अनेक ठिकाणचे शेत खरडून गेले आहे. त्यानंतर सुरू असलेल्या सततच्या पावसाने जमिनी ओलाव्याने पोकळ झाल्याने पावसासोबत आलेल्या वाऱ्याने वाढलेली पिके आडवी होत आहेत. मक्याच्या कणसात सध्या दाणा भरत असताना बऱ्याच ठिकाणी वाऱ्यामुळे मक्याचे पीक जमिनीवर आडवे झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. प्रशासनाने पोक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची केली आहे. पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान होत असले तरी चांगला पाऊस पडून जलाशये भरल्यास रब्बीचे पिक दमदार येईल या आशेवर बळीराजा वेळ मारून नेत आहेत. ऐन दाणा भरत असताना मक्याचे पीक आडवे झाल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. पिकाच्या नुकसानीची तक्रार करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
कृषी विभागाचे आवाहन
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी खरीप हंगाम २०२४ मध्ये या पिकांचा पीक विमा भरलेला असेल, तर त्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांत पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाइन तक्रार करून द्यावी. तक्रार करताना नुकसानीचे कारण हे फक्त इन्युडेशन असे निवडावे. यामुळे तक्रार नाकारली जाणार नाही. तक्रार करण्यासाठी कंपनीचे अॅप गुगल प्लेवरून डाउनलोड करून घ्यावे. त्याचप्रमाणे चोला मंडलम इन्श्युरन्सचा टोल फ्री क्रमांक १४४४७ यावर संपर्क साधावा.