गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तिकीट चार महिन्यांपासून काढल्या जात असून सध्या नियमित जाणाऱ्या सर्व गाड्यांची प्रतिक्षा यादी अडीचशेहून अधिक आहे. सर्व गाड्या फुल्ल झाल्यामुळे रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांवरही कोकणवासीयांनी उड्या मारल्यामुळे कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांची प्रतिक्षा यादी वाढत आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळ्याच्या सर्व स्थानकांमधून सुटणाऱ्या गाड्यांही पुर्ण क्षमतेने फुल्ल झाल्या आहेत.
दुसरीकडे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून कोकणावासीयांसाठी आव्वाच्या सव्वा भाडे सांगितले जात आहेत. त्यामुळे काही मंडळींची इच्छा असूनही गणेशोत्सवासाठी गावी जाता येत नाही. याच संधी हेरून अनेक राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कोकणावासीयांसाठी गणेशोत्सवा दरम्यान विशेष मोफत गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू असली तरी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या संख्येने यंदा कोकणात गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्वच नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालये आणि शहरामध्ये ठिकठिकाणी बोर्ड लावून गाड्यांसाठी नावे नोंदवण्याचे वाहन सुरू करण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांमध्ये ठिकठिकाणी असे बोर्ड दिसून येत आहेत. तर परिसरातील जनसंपर्क कार्यालयामध्ये नावे नोंदवली जात आहेत.
लोकप्रतिनिधींचाही सहभाग
शिवसेना, मनसे, आणि भाजप या पक्षाच्या इच्छुकांची गाड्या सोडण्यामध्ये मोठी संख्या आहेत. विद्यमान खासदार आणि आमदार यांच्या माध्यमातूनही गाड्या सोडण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. कोकणवासीयांची वस्ती असलेल्या भागांमध्ये यासाठी जनजागृती केली जात आहेत. कोकणातील काही आमदारांनीही या भागातील आपल्या गावागावातील नेत्यांना यासाठी नावे नोंदवण्यास सुचना दिल्या आहेत. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान यापैकी अनेक गाड्या कोकणाच्या दिशेने जाणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. येत्या विधानसभा आणि त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणूकांसाठी इच्छुकांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. कोकणात जाणाऱ्यांची नाव नोंदणी करून त्यांच्याकडून येणारी मते आपल्याकडे वळवण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा मार्ग ठरू लागला आहे.
कोकणातील सर्व भागांमध्ये सोय
दापोली, खेड, चिपळून, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवगड, कणकवली आणि सावंतवाडी या मार्गाने या बसेस कोकणात जाणार आहेत. आलिबाग, श्रीवर्धन, तळा, म्हासळा, माणगाव, पोलादपूर, मालवण, कुडाळ, मंडणगड, गुहागर, वेंगुर्ला दोडामार्ग, संगमेश्वर, लांजा, साखरपा, वैभववाडी, रोहा, राजापूर, अशा सगळ्याच मार्गांवर काही मंडळींनी विशेष गाड्या सोडल्याचे समोर आले आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ-बदलापूर या शहरातूनही या गाड्या सोडण्यात आल्या आहेत.