आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पाहाणीसाठी
गृहमंत्र्याना बदलापूर प्रकरणावर बोलण्यासाठी वेळ नाही. गृहमंत्री राजकारण करत असल्याची टीका केली. आपल्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे, तो भाजपच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे. मिंधेंच्या खोक्यांमुळे पडला आहे आणि हे जगजाहीर आहे. पुतळा बांधणारे आपटे कोण आहे, कोणाच्या जवळचा आहे, तो फरार कसा झाला हे जनतेसमोर आलं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले.
राजकोट किल्ल्यावर राडा
किल्लावरील हे दुर्दैवी आहे, हा बालिशपणा आहे. मी किल्ल्यावर आत येत असताना धक्काबुक्की झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे, की महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण राजकारण करायचं नाही, म्हणून मी सर्व नेते अडवून धरले आहेत, असंही या राड्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
‘जितका वेळ थांबावं लागेल, तितका वेळ थांबू’
राजकोट किल्ल्यावर नारायण राणेंचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाराजांच्या या किल्ल्यावर हाणामारी, शिवीगाळ करण्यात आली, याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी ही सुरुवात कुठून झाली हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही इथे नीट, शांत येत होतो, आपले कार्यकर्ते बाहेर आहेत, मग पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आत कसं सोडलं. ही काय जागा आहे का राडा करायची, असं म्हणत त्यांना आम्ही रोखलं, नाहीतर आतापर्यंत ते साफ झाले असते, अशी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी या राड्यापेक्षा अधिक महाराजांचा पुतळा कोसळला ही गोष्ट महत्त्वाची असल्याचंही त्यांनी म्हटलं. या राड्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी जितका वेळ इथे थांबावं लागेल तितका वेळ थांबू असंही म्हटलं आहे.
काही बालबुद्दी असणारे नेते इथे आले होते. त्या लोकांनी हा राडा करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लोक महाराष्ट्राला लुटत आहेत. प्रकल्प गुजरातला नेतात. वाजपेयींची बाजू वेगळी होती. भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष झालेला आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली.