गद्दारांची सारवासारव संतापजनक, ‘बरं झालं’ म्हणणाऱ्या केसरकरांना ठाकरेंनी झापलं

मुंबई: मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या राजकोट किल्ल्यांवर कोसळला, त्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे पोहोचले होते. मात्र याचवेळी तिथे नारायण राणे, नितेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह पाहणीसाठी पोहोचले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला. यानंतर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी तातडीची पत्रकार परीषद घेतली. यामध्ये ते सरकारविरोधात येत्या १ सप्टेंबरला गेट वे येथे जोडे मारो आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

उद्धव ठाकरेंचा संताप

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात एकप्रकारची अस्वस्थता आहे. दिवसागणिक महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार वाढत आहेत. काल परवा जे घडलं ते कधीही घडलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कोसळला. एकूणच हे जे काही महाफुटीचं सरकार आहे, यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे आणि कारभाराने किळस आणला आहे. या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंदचा पुकार दिला होता. कोर्टाच्यामाध्यमातून त्यावर बंदी आणली. आता महाविकास आघाडीतर्फे मालवण येथे जो पुतळा समुद्रात कोसळला, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यामध्ये मोदी-शहांच्या दलाला आणि काही शिवद्रोही रस्ता अडवून बसले.

महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला असं कारण दिलं जात आहे, हे मुळात अत्यंत निर्लज्जपणाचं कळस गाठणारं कारण आहे. माजी राज्यपाल कोश्यारी हे देखील समुद्राशेजारी राहत होते, त्यांनीही महाराजांचा अपमान केला होता. पण माझ्यातरी वाचण्यात कधी वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असं आलेलं नाही.
हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत, केसरकर जे बोलत आहेत, काही वाईट तर त्यातून चांगलं घडेल, हे संतापजनक आहे. येत्या रविवारी १ सप्टेंबरला हुतात्मा स्मारकाला वंदन करुन तिथून गेट वेला जिथे महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, यासमोर जमणार आहोत आणि सरकारचा निषेध करण्यासाठी जोडे मारो आंदोलन करणार आहोत. हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल. मी असेल, शरद पवार, नाना पटोले असतील, तसेच, सर्व शिवप्रेमींनी सरकारचा निषेध करण्यासाठी तिथे एकत्रित यावं, असं अवाहान उद्धव ठाकरेंनी केलं.

गेल्या लोकसभेपूर्वी ज्या पद्धतीने मोदी आले होते, एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटत होती की नौदल दिन हा कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला. याचा अभिमान सर्वांना झाला. पण, केवळ एक काहीतरी गाजवतो आहे आणि श्रेय घ्यायचं आहे म्हणून घिसाटघाईने जो पुतळा केला गेला त्याबद्दल सगळ्या गोष्टी उघड होत आहेत. तो शिल्पकार कोण होता, कंपनी कुठली होती, त्यात ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काही माहिती येत आहे, या स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुढेही तेच होणार. त्यांच्या कारभाराची आता किळस येत आहे.

सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना हे पटलं असेल असं मला वाटत नाही, मी त्यांना शिवद्रोही म्हणतो. त्यांच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत, ते तिकडे आडवे आले आहेत. ते कोण आहेत हे चॅनलवर आले आहेत.

Source link

Narayan Raneshiv sena bjp face offShivaji Maharaj Statue CollapseUddhav Thackerayuddhav thackeray press conferenceआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे पत्रकार परीषदनारायण राणेराजकोट छत्रपती शिवाजी महाराज पुतळाशिवरायांचा पुतळा कोसळला
Comments (0)
Add Comment