मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर, वाईटातून चांगलं घडावे, म्हणून हा अपघात घडला असावा, असे वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहीकडून टीका केली जात असून बुधवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत या सर्व प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी ते म्हणाले, सर्वात आधी नौदलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या देशाचे संरक्षण दल असलेल्या नौदलाचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल असेच काम व्हायला हवे. राजकारण कोणीच करू नये नवा पुतळा लवकरात लवकर उभारला जावा ही माझी मागणी आहे.
तर ‘हा पुतळा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी नौदलाने घेतली आहे. तरी तुम्ही बोलता याचा अर्थ तुम्हाला नौदलाबद्दल आदर नाही. उद्धव ठाकरेंबद्दल मी बोलू शकतो पण आदर राखतो. नौदल आणि राज्य सरकार मिळून स्मारक बांधणार आहे. पुतळा ते उभारणार आहेत. त्यासाठी कोणी मोर्चा काढण्याची गरज नाही. ते स्मारक वेगाने बांधता यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे केसरकर म्हणाले.
राज्य सरकारची तातडीची बैठक
तर घडलेल्या घटनेचे गांभीर्य पाहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते. तर जनसन्मान यात्रा सुरु झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित नव्हते. रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.