शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली

Narendra Modi apology for Shivaji Maharaj Statue collapse : छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो, असं मोदी म्हणाले

शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, पुतळा अपघात प्रकरणी पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली

पालघर : वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी त्यांची माफी मागतो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी क्षमायाचना केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होता. पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. काही जण सावरकर यांना नावं ठेवतात, त्यांनी माफी मागितली का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर होते. सकाळी अकराला मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला त्यांनी भेट दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पालघरला येत सिडको ग्राउंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन केले.

जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्याशिवाय, मोदी यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायासंबंधी २१८ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. सुमारे १,५६० कोटी रुपयांचे हे प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले.

एकात्मिक ॲक्वापार्क, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून याद्वारे मत्स्यउत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच या क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे यासाठी पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवली जाईल. मासेमारी बंदरांसह, मत्स्य साठवणूक केंद्रे, अद्ययावतीकरण, मासळी बाजार आदी महत्त्वाच्या मत्स्यव्यवसायसंबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी करण्यात आली.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

chhatrapati shivaji maharaj statue collapseNarendra Modi Shivaji Statue collapse apologyNarendra Modi Vadhavan PortPalghar newsRajkotनरेंद्र मोदी माफी मागितलीनरेंद्र मोदी वाढवण बंदर भूमिपूजनपंतप्रधान मोदी पालघर दौरामालवणशिवाजी महाराज पुतळा अपघात
Comments (0)
Add Comment